कोंढवा, दि. 6 (प्रतिनिधी) -कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक मुख्य रस्त्यावरील इमारतींना पार्किंगसाठी जागाच ठेवलेली नसल्याने इमारतींसमोरील मोकळ्या जागेत रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. या मार्गावर “नो पार्किंग’च्या फलकांसमोरच शेकडो दुचाकी व इतर वाहने भर रस्त्यात उभी केली जात असल्याने रस्ता अरुंद होऊन जीवघेणी वाहतूक कोंडी होत आहे. यातून छोटे-मोठे अपघात घडत असून पालिकेचा अतिक्रमण कारवाई विभाग व कोंढवा वाहतूक पोलीस विभाग मात्र सुस्त आहे. या मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
कोंढवा मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने वाहने पार्कीगसाठी जागाच उरलेली नाही, भररस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. जागोजागी “नो पार्किंग’चे फलक लावण्यात आलेले असतानाही अशा फलकांशेजारीच वाहने उभी केली जात आहेत.
वाहतूक पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नो पार्कीगमध्येच वाहने उभी करून वाहनचालक बिनधास्त असतात. पोलिसांचा कोणताच धाक अथवा दंडाची भितीयामुळे राहिलेली नाही.
या मार्गावर हॉटेल्स, मॉल, हॉस्पिटल्स, बॅंका इतर व्यावसायिकांना कोणतीही स्वतंत्र पार्कीग केलेली नसल्याने याठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यातच वाहने उभी करीत आहेत. या मार्गावरील बसथांब्यांमध्येही अतिक्रमण करुन स्वतःची दुकाने थाटली आहेत, त्यामुळे प्रवाशांना भर रस्त्यात उभे राहावे लागत आहे. ही स्थिती दिसत असतानाही पालिका प्रशासन कोणतीच कारवाई का करत नाहीत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहतूक पोलीस विभाग व पालिका प्रशासनाने रस्त्यात अतिक्रमण करणारे व नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरीकांनी केली आहे.