रेठरे बुद्रुक – कृष्णा कारखान्याच्या उभारणीनंतर जुना लाकडी पुलाला पर्याय म्हणून नवीन पक्का पूल उभारणीच्या काळात गावातील नेतेमंडळींचा दबदबा व अथक परिश्रम सर्वांनी पाहिले आहेत. परंतु, जसजशी लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. आर्थिक सुबत्ता आली तसा सत्ता संघर्ष सुरू झाला. लोक राजकारणाकडे वळले. आणि रेठरे पुलाला तेंव्हापासूनच राजकीय उदासीनतेच्या ग्रहणाची परंपरा सुरू झाली. या राजकारणात कारखान्याच्या उभारणीत एकदिलाने झटणारे स्व. आबासाहेब मोहिते, स्व. यशवंतराव मोहिते, स्व.जयवंतराव भोसले ही दिग्गज मंडळी हळूहळू एकमेकांपासून दुरावली गेली.
दरम्यान, येथील राजकारणात वाळू उपशाला राजकीय पाठबळ मिळाले. याचा फायदा घेत वाळू माफियांनी पुलाच्या बुडालाही वाळू काढली. परिणामी 2006 साली आलेल्या महापुराचा दणका रेठरे पूल सहन करू शकला नाही आणि पुलाचा पिलर खचला. रेठरे बुद्रुकचा कृष्णा साखर कारखाना म्हणजे कृष्णाकाठच्याच नव्हेतर राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे सत्ता केंद्र आहे. त्यामुळे गटातटाचे राजकारण परिसरातील भावबंदकीत आणि घराघरात शिरले. आणि गावाच्या तसेच विभागाच्या प्रगतीला कारणीभूत असणारी मंडळी एकमेकांपासून दुरावली गेली. कृष्णा कारखाना राजकीय आखाडा बनल्याचा फायदा प्रत्येकजण घेऊ लागला. याला वाळू व्यावसायीकही अपवाद राहिले नाहीत.
कृष्णेची वाळू म्हणजे काळ सोनं. पुण्या, मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून कृष्णाच्या वाळूला मोठी मागणी आहे. या वाळू व्यवसायातून भरमसाठ पैसा मिळू लागल्याने कृष्णाकाठावरील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर या व्यवसायात सामील झाला. तरुण मंडळी म्हणजे येथील प्रत्येक निवडणुकीत महत्वाचा घटक. तसेच ही व्यावसायिक मंडळी कोणत्या ना कोणत्या गटाला चिटकूनच त्यामुळे नदीपात्रात पुलांनाजीक ठराविक अंतरापर्यंत वाळू उपसा करण्यास परवानगी नसतानाही रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत पुलाच्या बुडाखालाची वाळू उपसा करण्यात आला.
पुलानाजीक वाळू उपसा करू नये, म्हणून सामाजिक कार्यकर्ते, युवकांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला.
परंतु, त्यांना राजकीय पाठिंबा मिळाला नाही. आणि वाळू उपशाला विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबला गेला, हे वास्तव आहे. भरमसाठ आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाळू उपशामुळे नदीपात्र रुंदावले. नदीकाठच्या जमिनी खचल्या. वाळूतून मिळणारा मोबदला दिसत होता. पणं भविष्यातील परिणामांचा कोणीच विचार करत नव्हते. 2006 साली महापुराने दणका दिला. पुलाचा आधार असलेली वाळू व मलमा निघून गेल्यामुळे महापुराचा दणका हा पूल सहन करू शकला नाही. आणि अखेर तब्बल वीस वर्षांनंतर पुलाचा एक पिलर खचला.