मंचर -आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डिंभे खुर्द येथे रविवारी (दि. 31) दुपारी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याने शरदचंद्रजी पवार विद्यालयाच्या इमारतीचे लोखंडी कोटींगचे पत्रे उडून गेले. त्यामुळे इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने याच इमारतीत करोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईवरून येऊन क्वारंटाइन केलेल्या चार व्यक्ती बालंबाल बचावल्या. या घटनेत इमारतीचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
डिंभे खुर्द परिसरात रविवारी (दि. 31) दुपारी जोरदार वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. या वादळी वाऱ्यामुळे गावातील शरदचंद्रजी पवार विद्यालयातील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवीच्या वर्गावरील छताचे लोखंडी कोटींगचे पत्रे उडून सुमारे अडीचशे फूट अंतरावर जाऊन पडले. विशेष म्हणजे सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मुंबईवरून दाखल झालेल्या चार व्यक्तींना त्याच इमारतीच्या इयत्ता पाचवीच्या वर्गात क्वारंटाइन केलेले होते. त्याचे वर्गाच्या छतावरील पत्रे उडून गेले.
तसेच इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहे. या इमारतीचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव पिंगळे यांनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरजित खराडे यांना दिली आहे. या वादळी वाऱ्यामुळे डिंभे खुर्द गावातील सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले आहे.