पुणे-सातारा महामार्गावरील स्थिती : वाहतूक कोंडीकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष
कापूरहोळ – राज्य शासनाकडून महामार्ग तसेच रस्त्यांची कामे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर दिली जात असताना शासनाने संबंधीत कंपन्याशी टोलबाबत विशिष्ठ उल्लेख केलेला असतो. टोल आकारणी करताना कुठलेही वाहन तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ नाक्यावर थांबवू नये, असे स्पष्ट आदेश असताना या नियमाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, राज्य शासनाच्या परिपत्राकानुसार हा नियम पाळणे टोल प्रशासनास बंधनकारक आहे.
पुणे-सातारा महामार्गाचे काम केंद्राच्या अखत्यारीत येत असताना तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी विशेष अधिकारात असे आदेश काढले होते. परंतु, त्यांच्यानंतर हा नियम टोल प्रशासनाने पुन्हा बासनात गुंडाळून ठेवला असल्याने टोल नाक्यावरील गर्दी आणि वाहनांच्या रांगा वाढू लागल्या आहेत.
पुणे-सातारा महामार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आमदार संग्राम थोपटे यांनी संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कामे वेळेत झाली नाहीत तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे. याच प्रश्नी शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे यांनीही आंदोलन करीत या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. परंतु, याच मार्गावरील टोलनाक्यावर होणाऱ्या गर्दीचाही प्रश्न कायम आहे.
हा मार्ग केंद्रीय योजनांतर्गत येत असल्याने यास राज्य शासनाचे नियम लागू होत नाहीत का? असा प्रश्न असताना तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत या मार्गावरील टोल नाक्यांसाठी तीन मिनीटापेक्षा वाहन थांबवू नये, हा नियम लागू केला होता. त्यावेळी टोलनाक्यावरील गर्दी आटोक्यात आली होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर टोलनाका प्रशासनाकडून हा नियम पाळला जात नसल्याने वाहनांची गर्दी वाढू लागली आहे.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. शनिवार, रविवार तसेच सलग सुट्ट्यांच्या दिवसात नाक्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीतून टोलसाठी प्रवासी, वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तीन मिनिटांत टोल घ्या आणि वाहने पुढे जावू द्या, असा पूर्वीच्या आदेशाची अंमलबजावणी पुन्हा एकदा सुरू करणे गरजेचे ठरत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल आकारणीचे काम दिलेल्या कंपन्यांमध्ये अशा प्रकारचा करार करण्यात आला असून तो पाळणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे तसेच हा नियम न पाळणाऱ्या टोल वसुली कंपन्यांवर भारतीय फौजदारी दंडसंहिता कायद्यातील लोकउपद्रव या कलमाखालीही कारवाईची तरतूद असल्याचे सांगितले जाते. परंतु, टोलनाक्यावरील गर्दीवरील कोंडी टाळण्यासाठी संबंधीत कंपन्यांन्यांकडुन कुठलीच व्यवस्था केले जात नसल्याने महामार्गांवरील टोलनाक्यांवर कायमच गर्दी होत आहे. याकामी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हंटले जात आहे.
प्रवासाचा निम्मा वेळ टोलनाक्यावरच…
पुणे-सातारा मार्गाची सध्याची स्थिती पाहता दिड ते दोन तासावरील या प्रवासासाठी तीन तासाचाही वेळ लागतो. त्यातही धावत-पळत येणाऱ्या चालकांना त्या-त्या ठिकाणच्या टोलनाक्यावर कमीत कमी अर्धा ते एक तासभर तरी थांबावे लागत असल्याने प्रवासाचा अर्धा वेळ टोलनाक्यावरच काढण्याची वेळ वाहन चालकांवर येत आहे. त्यातही मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास प्रवासाचा तसेच टोकनाक्यावरील वेळही वाढत असल्याने वाहन चालक त्रस्त आहेत.