बारामती: “काळ आला होता पण वेळ आली नव्हती” या म्हणीचा प्रचिती देणारी घटना बारामतीत घडली आहे. वादळी पावसामुळे एक लिंबाचे झाड रस्त्यावर कोसळले असून या दुर्घटनेतून काही सेकंदाच्या फरकाने दहाजनांचे प्राण वाचले आहेत.
बुधवारी बारामतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता. बारामती तालुक्यातील गुणवडी याठिकाणी बारामती वालचंदनगर रोडवरून एक प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा समोरून काही दिसत नसल्याने पावसामुळे जागेवर थांबली. रिक्षातील एक जण उतरला आणि ती रिक्षा दहा फूट पुढे गेली, आणि दहा पंधरा सेकंदात जोराच्या वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले लिंबाचे भले मोठे झाड ज्या ठिकाणी रिक्षा उभी होती त्याठिकाणी अचानक कोसळले. रिक्षा पुढे गेेली नसती तर त्या रिक्षावर ते झाड कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. मात्र त्या रिक्षातील दहा जणांचे नशीब बलवत्तर म्हणून आज त्यांचा जीव वाचला आहे.