संगमनेर (प्रतिनिधी) –पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात साठ ते सत्तर फूट खोलदरीत कार कोसळली. कारच्या अऩेक पलट्या होऊन केवळ दैव बलवत्तर म्हणून कारमधील तिघे तरुण बचावले. रविवारी सकाळी ही घटना घडली.
खोलदरी व गाडीची परिस्थिती बघून काळ आला होता पण वेळ नाही, असे रस्त्याने जाणारे लोक म्हणत होते. गुजरात राज्यातील मितेश कथेरिया, स्नेहल पोकीया, भार्गव रामोलीया हे तिघे तरुण कारने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने देवदर्शनाला भीमाशंकरला जात होते.
रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास माहुली घाटातून जात असताना चालकाला अंदाज न आल्याने कार थेट महामार्ग सोडून साठ ते सत्तर फूट खोलदरीत कोसळली. कोसळली. परंतु केवळ दैवबलवत्तर असल्याने कारमधील तिघेही तरूण कारमधून सुखरुप बाहेर आले. कारने चार ते पाच पलट्या खाल्ल्या असल्याचे या तरूणांनी सांगितले.
कार पलटी झाल्याची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील साईनाथ दिवटे,रमेश शिंदे ,अरविंद गिरी, योगीराज सोणवने यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर घारगाव पोलिस तसेच हिवरगाव पावसा टोल नाक्याचे विजय पवार हेही घटनास्थळी आले होते. या अपघातात कारचा अक्षरशा चक्काचूर झाला आहे. ज्या ठिकाणाहून कार पलट्या खात गेली, त्याठिकाणी मोठ-मोठे दगडही आहेत.