राजगुरूनगर -“जगलो तर तुमचा, नाही तर शेतकऱ्यांचा’ अशी भावना आपल्या पत्नीकडे व्यक्त करीत रिंगरोड आणि पुणे-नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी दोन्ही प्रकल्पांच्या विरोधात राजगुरूनगर येथील प्रांत कार्यालयासमोरील पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याचा मंगळवारी (दि. 6) सकाळी सहाच्या सुमारास प्रयत्न केला.
“शोले स्टाइल’ने झालेल्या या आंदोलनाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतल्याने बघ्यांची येथे मोठी गर्दी झाली. साडेचार-पाच तासांच्या या “शोले स्टाइल’ आंदोलनामुळे प्रशासन मात्र खडबडून जागे झाले.
जोपर्यंत प्रांताधिकारी घटनास्थळी येत नाही, शासनाची भूमिका स्पष्ट करीत नाहीत तोपर्यंत खाली येणार नाही. कोणी अडवण्याचा प्रयत्न केला आणि अधिकारी आले नाहीत तर आत्महत्या करण्याचा पवित्रा घेतला.
उंच टाकीवरून आत्महत्या करीन, असा इशारा दिला. घटनास्थळी तात्काळ खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहायक निरीक्षक राहुल लाड पोलिसांसह आले. जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी गवारी यांना खाली येण्यास सांगितले; मात्र ते त्यांच्या मतावर ठाम होते. त्यानंतर नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी प्रयत्न केले. तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी प्रयत्न केले; मात्र गवारी काही केल्या ऐकत नव्हते.
दरम्यान, पाटीलबुवा गावरी यांच्या पत्नी, खेड पंचायत माजी सभापती कल्पना गवारी या दोन मुलांसह तेथे आल्या. अवस्था पाहून त्यांनी तहसीलदार, पोलीस अधिकाऱ्यांकडे विनवणी केली. काही करा पण प्रांताधिकारी यांना येथे घेऊन या. माझ्या पतीचे बरेवाईट होण्याअगोदर प्रयत्न करा. प्रांत का येत नाही, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे.
अशी व्याकुळतेने विनवणी केली. अधिकाऱ्यांनी प्रांताकडे तसा निरोप पाठवला; मात्र प्रांताधिकारी काही केल्या येत नव्हते. अखेर कल्पना गवारी आंदोलक शेतकरी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यांनंतर प्रांत कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांना पाटीलबुवा गवारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ यावेच लागले.
…अन् गवारी यांना पकडून खाली आणले
प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक अनिल लंभाते यांनी प्रयत्न करूनही पाटील गवारी यांनी त्यांचे टाकीवरील “शोले स्टाइल’ आंदोलन सुरू ठेवले. गवारी यांच्यासह आंदोलकांवर कोणताही गुन्हा दाखल न करण्याचा आश्वासनानंतर काही कार्यकर्ते टाकीवर गेले. तेथे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांना पकडून टाकीवरून खाली आणण्यात आल्यानंतर या “शोले स्टाइल’ थराराचा शेवट झाला.