रायगड – पेणमध्ये तिघा तरुणांना मालगाडीने चिरडल्याची दुर्घटना समोर आली आहे. रोह्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीने रेल्वे रुळावर बसलेल्या तीन तरुणांना चिरडले. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील पेण शहराजवळ घडलेल्या अपघाताने हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, हा अपघात आहे की घातपात याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
सुशील वर्मा, सुनील वर्मा आणि निखिल गुप्ता अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री सुनील वर्मा, सुशील वर्मा आणि निखिल गुप्ता हे तीन तरुण पेण रेल्वे स्टेशनपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर रेल्वे ट्रॅकवर गेले होते. यावेळी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पेण रेल्वे स्टेशनवरून एक मालगाडी रोह्याच्या दिशेने जात होती.
दरम्यान, ट्रॅकवर बसलेल्या या तिघा तरुणांना मालगाडीने चिरडले. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. तिघे तरुण रेल्वे रुळावर कशासाठी गेले होते, हा नेमका अपघात आहे की त्यामागे दुसरे काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, औरंगाबादमध्ये ठीक एक महिन्यापूर्वी अशीच दुर्घटना घडली होती. यात मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाला होता. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा 8 मे रोजी पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला होता. ही दुर्घटना औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात एमआयडीसीच्या निर्माणाधीन पुलाजवळ घडली होती.