मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल गटनेत्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतले. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक असेल, अशा आशयाची टीकाही त्यांनी फडणवीसांवर केली. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंचे मुंबईतील गटनेता मेळाव्यातील भाषण म्हणजे अरण्यरुदन होते, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. “कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरुदन होतं. माझा त्यांना सवाल आहे की आम्ही तर कायदेशीररीत्या निवडून आलो आहोत. मात्र, जेव्हा आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठित तुम्ही खंजीर खुपसला, तेव्हा तुम्ही राजीनामे का नाही दिले? तेव्हा का नाही निवडणुका घेतल्या?” असे फडणवीस म्हणाले.
“तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडून आला नव्हतात. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून आमच्यासोबत निवडून आला होतात. हिंमत होती, तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं होतं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं होतं. त्यामुळे मला वाटतं की कालचं त्यांचं भाषण निराशेचं भाषण होतं”, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी एक प्रसिद्ध शेर एकवत उद्धव ठाकरेंना आव्हान दिले. “ते भाषणात असंही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक ठरेल. मी त्यांना एवढंच सांगतो, की मुद्दई लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में होता है. तुम्ही तिघांनी मिळून २०१९लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकला नाहीत. यापुढेही संपवू शकला नाहीत”, असे फडणवीस यावेळी म्हणाले.