कामगारांचा गावाकडे परतीचा प्रवास
हॉटेल-खानावळी पडल्या ओस, मजूर अड्डयावर शुकशुकाट
पिंपरी – करोनाचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असून पिंपरी चिंचवड शहरातील बाजारपेठेत आणि नेहमीच गजबजलेल्या रस्त्यांवरही शुकशुकाट दिसत आहे. काही अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील व्यवसायांवर करोनाचा परिणाम झाला असून अनेक नागरिकांनी “गड्या आपला गावच बरा’ म्हणत गावाकडची वाट धरली आहे.
उन्हाळ्यात शेती व कामधंदा नसल्यामुळे राज्यभरातून तसेच परराज्यातून अनेक जिल्ह्यांमधून हातावर पोट असणारे कामगार व मजूर दरवर्षी पिंपरी चिंचवड शहरात दाखल होत असतात. मात्र यंदा याउलट परीस्थिती आहे. करोना व्हायरसच्या दहशतीमुळे बाहेरगावहून मजूर येणे तर सोडाच पण शहरातील कामगार आणि शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनीही गावाकडची वाट धरली आहे.
केवळ मजूरच नव्हे तर उच्चशिक्षीत तरुणांनीही देखील वर्क फ्रॉम होम चा पर्याय निवडत गावाकडे जाणे पसंत केले आहे. यामुळे शहरातील हॉटेल व खाणावळी ओस पडू लागल्या असून रोज केवळ दहा टक्केच व्यवसाय होत असल्याची चिंता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. चिकन मटन व्यवसाय, हॉटेल, चित्रपटगृह तसेच मॉल व बांधकाम व्यवसायासह सराफी व्यवसायाला करोनाचा फटका बसला आहे. करोना संसर्गाच्या भीतीने ग्राहकांनी हॉटेल, चित्रपटगृह व मॉलकडे पाठ फिरवली आहे. तसेच लहान व्यावसायिकांना देखील “करोना’मुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी रोज तीन ते पाच हजार रुपये व्यवसाय व्हायचा, तो आता तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत खाली घसरला आहे.
सोशल मीडियावर करोना विषाणूबाबत व्हायरल होत असलेल्या माहितीमुळे कामगार वर्गाने धास्ती घेतली असून अनेकजनांनी सहकुटुंब गावाकडे परतण्यास सुरुवात केली आहे. खासकरुन मराठवाडा, सातारा यासह राज्यातील विविध गावातून हातावर पोट घेउऩ आलेले कामगार कुटुंब आता गावाकडे परतू लागले आहेत. मात्र परराज्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर होळीचा सण करुन नुकतेच परत येत असल्याची माहिती बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
शिवभोजन थाळीच्या रांगा घटल्या
राज्य सरकारने दहा रुपयात जेवण हा शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरु केला आहे. यात थाळ्यांची संख्या मर्यादित असल्याने जो प्रथम येईल, त्याला जेवण दिले जाते. यामुळे एरव्ही शिवभोजन थाळीसाठी रांगा लागायच्या. परंतु आता त्या रांगाही घटल्या आहेत. शिवभोजन थाळी देणाऱ्या कॅन्टीनमध्ये जेवणाच्या वेळी बोटावर मोजण्याइतकेच ग्राहक दिसत होते.
“सायन्स पार्क’ बंद
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तव पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक यांच्या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत पिंपरी चिंचवड सायन्स पार्क बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. करोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता विज्ञानप्रेमीसाठी सायन्स पार्क बंद ठेवण्यात येत असल्याचे सायन्स पार्कच्यावतीने सांगण्यात आले आहे.
नेहमी कंपनीतील कामगार, तसेच विद्यार्थी व बॅचलर मुले जेवणासाठी खाणावळीत येतात. परंतू करोनाच्या भीतीने अनेकजन खाणावळीत येणे टाळत आहेत. तर काहीजण गावाला निघून गेले आहेत. बहुतेकांनी करोनाच्या धास्तीने गावाकडची वाट धरली आहे. ज्यांना गावाकडे परतणे अशक्य आहे, अशीच लोक सध्या खानावळीत जेवणासाठी येत आहेत. बरेचसे विद्यार्थी गावाकडे गेले आहेत. मात्र ज्यांना पर्याय नाही, अशीच लोक केवळ खाणावळीत येत आहेत. केवळ 25 टवक्के व्यवसाय होत असून 75 टक्के व्यवसाय घटला आहे.
– केहारसिंग लालसिंग गुरखा, खानावळ व्यावसायिक, खराळवाडी.
करोनाचा बांधकाम व्यवसायावर नक्कीच परीणाम झाला आहे. कामगारांचे प्रमाण दरवर्षीपेक्षा सात ते आठ ट्टके घटले आहे. मात्र छत्तीसगड तसेच यूपी व एमपी व इतर राज्यातील मजूर होळीचा सण साजरा करुन परतत आहेत. हे कामगार आजारपणाला घाबरत नाहीत. त्यांना हाताला काम पाहिजे. करोनामुुळे कामगारांचे प्रमाण आठ ते दहा टक्के कमी झाले आहे.
– जयंत शिंदे, अध्यक्ष, बांधकाम कामगार संघटना