रंगतदार कवी संमेलन
कवी महेंद्रकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली रंगतदार कवी संमेलन झाले. त्यामध्ये विश्वनाथ साठे, सुनील भिसे, अनिल नाटेकर, डॉ. गंगाधर रासगे, आसाराम कसबे, सुमंतकुमार गायकवाड, विनोद अष्टुळ, अण्णा कसबे, गणेश आघाव, चंद्रकांत जोगदंड, आत्माराम हारे, आनंद गायकवाड, गणेश पुंडे, अजय भिलारे, अनिल नाटेकर आदी कवींनी विविध कविता सादर करून कवी संमेलनात बहार आणली.
पिंपरी –“महापुरूषांच्या विचारांविषयी केवळ आस्था ठेवून चालणार नाही. तर, त्यांच्या विचारांचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करणे देखील आवश्यक आहे. याबाबतचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे”, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी भोसरी येथे व्यक्त केले.
मातंग साहित्य परिषदेने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात म्हणून आयोजित केलेल्या साहित्यिक कृतज्ञता पुरस्कारांचे त्यांच्या हस्ते वितरण झाले. कांदबरीकार सुरेश पाटोळे, कथाकार अण्णा धगाटे, चरित्रकार संपत जाधव, कवी अनिल नाटेकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना सांगोलेकर बोलत होते. भोसरी-धावडे वस्ती येथील राणी पुतळाबाई विधी महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ऍड. कोमल ढोबळे-साळुंखे होत्या.
अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (पिंपरी-चिंचवड) शाखा अध्यक्ष राजन लाखे, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहिरराव, क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे चरित्रकार शंकर तडाखे, अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवाचे (पिंपरी-चिंचवड) अध्यक्ष सतीश भवाळ, शाहू शिक्षण संस्थेचे संचालक अजय साळुंखे आदी उपस्थित होते. शाल, तुळशीचे रोप, णा भाऊ साठे यांच्यावरील पुस्तक आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून वर्षभरात विविध महत्त्वाचे उपक्रम घेणार असल्याचे गोरखे यांनी नमूद केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक प्रा. धनंजय भिसे यांनी सांगितले. गणेश आगाव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह संतोष ससाणे यांनी आभार मानले.