नवी दिल्ली – करोनाने लोकांचे जीवन तसेच उद्ध्वस्त करून ठेवले आहे. करोनाची दुसरी लाटच जीवघेणी ठरली आहे. त्यातच आज केंद्र सरकारने तिसऱ्या लाट नक्की येणार असल्याचे स्पष्ट केले.
देशातील करोनाची दुसरी लाट थांबायचे नाव घेत नाही आहे. या दरम्यान, केंद्र सरकारने करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला आहे. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन म्हणाले की, करोनाची तिसरी लाटही येईल. विषाणूचा संसर्ग त्याच्या उच्च स्तरावर आहे. तिसरी लाट कधी येईल आणि किती धोकादायक आहे, हे अद्याप माहिती नाही, परंतु नव्या लाटेसाठी आपण तयार असले पाहिजे. राघवन बुधवारी करोनाच्या स्थितीबद्दल पत्रकार परिषदेत बोलत होते.
याच पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, करोनाची प्रकरणे दररोज 2.4 टक्क्यांनी वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 प्रकरणे नोंदली गेली आहेत. 12 राज्यात एक लाखाहून अधिक, 7 राज्यात 50 हजार ते एक लाख आणि 17 राज्यांत 50 हजारांहून कमी सक्रिय प्रकरणे आहेत. 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा पॉझिटिव्ह स्तर 15 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे 10 राज्यात 5 ते 15 टक्के आणि तीन राज्यांत 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये अधिक मृत्यू होत आहेत. बंगळुरूमध्ये गेल्या एका आठवड्यात जवळपास 1.49 लाख प्रकरणे आढळून आली आहेत. चेन्नईमध्ये ही संख्या 38 हजार होती. काही जिल्ह्यात नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. यामध्ये कोझिकोड, एर्नाकुलम, गुडगाव यांचा समावेश आहे. 9 राज्यात 18+ लसीकरण सुरू झाले आहे. 18-44 वयोगटातील 6.71 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने 16 कोटीहून अधिक डोस विनामूल्य दिले आहेत.