महापालिका प्रशासनाने दिलगिरी केली व्यक्त; पुन्हा अशी चूक होणार नाही ः उपायुक्त
नगर – महापालिकेच्या मालमत्ता कराच्या थकबाकीच्या वसुलीसाठी मनपा प्रशासनाने दोन दिवसापूर्वी थकबाकीदारांच्या दारात बॅंड, ढोल, ताशा वाजवून तृतीयपंथीयांच्या सहभागातून वसुली करणार असल्याचे पत्रक काढले होते. मात्र, थकबाकीदारांच्या दारात न जाता तृतीयपंथी संघटनाच मनपाच्या दारात जाऊन मनपाचे वाभाडे काढले.
याबाबत तृतीयपंथी संघटनेशी कुठली ही चर्चा न करता मनपाने बदनामी केली आहे. असा जाब मनपा उपायुक्त सुनील पवार यांना विचारून टाळ्या वाजत मनपापुढे निदर्शने करण्यात आली.
याबाबत तृतीयपंथी संघटनेची अध्यक्षा काजल गुरु यांनी उपायुक्तांना निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने तृतीयपंथी उपस्थित होते. यावेळी तृतीय पंथीयांच्या अध्यक्षा काजल गुरु म्हणाल्या की, आम्हाला न विचारता तुम्ही परस्पर हा निर्णय घेतलाच कसा, आम्हाला रहायला घरं नाही, साधे रेशन कार्डही निघत नाही. आमच्या जगण्याचा प्रश्न आहे. परंतु महापालिकेने कधी सहानुभूतीने त्याकडे पाहिलं का? आता तुम्हाला गरज पडली म्हणून तुम्ही आम्हाला सुपारी द्यायला निघालेत असा सवाल महापालिका प्रशासनाला केला.
आम्ही लोकांच्या दारात तुमच्या वसुलीसाठी जाणार नाही. आम्ही चार घरं मागून जगतो. आता आम्ही प्रेमाने सांगायला आलो आहोत. या पुढे असं केलं तर महापालिकेच्या दारात साडी फेडून आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. तृतीयपंथयींच्या या भूमिकेमुळे महापालिका प्रशासनाचे एक प्रकारे वाभाडेच निघाले. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या प्रसिद्धी विभागाने थकबाकी वसुलीसाठी संबंधितांच्या घरासमोर ढोलताशा वाजवला जाईल. तसेच तृतीय पंथीयांनाही टाळी वाजवायला लावली जाईल, असे पत्रक काढलं होतं. ते आता अंगलट आहे.
याबाबत महापालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, या पुढे असा प्रकार होणार नाही. तसेच प्रसिद्धी विभागास तसे कळवले जाईल, असे महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांनी तृतीयपंथी संघटनेच्या अध्यक्षा काजल गुरु यांना सांगितले. याबाबत मनपाने पत्रक काडून थकबाकी वसूली साठी तृतीयपंथी सहभागी होणार नसल्याचे सांगितले.
खा. विखेंना पडला आश्वासनाचा विसर : काजल गुरु
सुजय विखे हे लोकसभा निवडणुकीला उभे होते, तेव्हा त्यांची काही लोक आली व तुमची दफनविधी व घरकुलांची कामे करतो, असे आम्हाला आश्वासन दिले. ते निवडून आता वर्ष होत आले. आम्ही त्यांना पत्र देऊन थकलो. पण आमचे कोणतेही काम मार्गी लागले नाही. त्यामुळे सुजय विखे यांचा मी निषेध करते, असे ते म्हणाले. तृतीयपंथीयांची कामे करू शकत नाही. विखे हे फोन सुद्धा उचलत नाही. ते भेटत नाहीत. मी हे त्यांचे नाव घेऊन सांगते. कारण आम्ही कुणाला घाबरत नाही’ अन त्यांना त्यांच्या आश्वसनाचा विसरच पडला आहे.