रांची: भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे याने यंदाच्या मोसमातील दुसरे तर मायदेशातील तिसरे शतक साजरे केले. येथे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी करताना रोहित शर्मासह चौथ्या गड्यासाठी विक्रीम भागीदारी देखील केली.
रहाणेने 169 चेंडूमध्ये 14 चौकार आणि एक षटकार ठोकत कसोटी कारकिर्दीतील 11 वे शतक साजरे केले. राहणेचे हे मोसमातील दुसरे शतक आहे. या पूर्वी त्याने ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 102 धावा केल्या होत्या.
रहाणेने मायदेशात तीन वर्षांनंतर कसोटी शतक फटकावले आहे. रहाणेने 2016 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात इंदूरला शतक फटकावले होते. त्या वेळी रहाणेने 188 धावा केल्या होत्या. हे शतक अजिंक्य रहाणेचे भारतीय मैदानावर केलेले चौथे शतक आहे, तर दक्षिण आफ्रिकेवरुद्ध त्याने केलेले हे तिसरे कसोटी शतक आहे.
फटकावला षटकार – रोहितनं कसोटी कारकिर्दीतील पहिलं द्विशतक पूर्ण करण्यासाठी 249 चेंडू खेळून काढले. लुंगी एन्जीडीच्या षटकात शटकार फटकावत त्याने द्विशतक साजरे केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी करणारा रोहित पहिला फलंदाज आहे. द्विशतक पूर्ण केल्यानंतर एन्गिडीच्या याच षटकात त्यानं दुसरा षटकार खेचला. त्यानंतरच्या रबाडाच्या षटकात षटकार ठोकण्याच्या नादात तो बाद झाला. या मालिकेत रोहितने तिसरे शतक झळकावले आहे. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 212 धावा करणाऱ्या रोहितच्या आता एकूण 529 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान त्यानं मिळवला आहे. त्यानं माजी कर्णधार अझहरुद्दीनलाही मागे टाकले आहे. त्याच्या नावावर 388 धावा होत्या.
या सामन्याच्या शनिवारच्या पहिल्या दिवशी अंधुक प्राकाशामुळे सामना लवकर थांबविण्यात आला अन्यथा त्याचे शतक पूर्ण झाले असते. इंग्लंडमधील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर रहाणेला संघात स्थान मिळाले. खरेतर त्याला त्या स्पर्धेत का खेळविण्यात आले नाही यावरून निवड समितीला टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र त्यावरून रहाणेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याने अखेर आपल्या बॅटनेच निवडसमितीला आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखविली.
यंदाच्या मोसमात रहाणेने कधी कोहलीच्या साथीत तर कधी रोहितच्या साथीत बहुमोल भागीदारी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याचे सातत्यच संघाला लाभदायक ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहित आणि कोहली जास्त प्रसिद्धी मिळवित असले तरी रहाणेचे योगदानही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे.