चिंबळी -“चिंबळीत पाच दिवसांत तिसऱ्यांदा रोहित्र जळाले’ या मथळ्या खाली दैनिक “प्रभात’मध्ये बुधवारी (दि. 9) वृत्त प्रसिद्ध होताच महावितरण खडबडून जागे झाले अन् शनिवारी (दि. 12) 200 एचपीचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आणि फ्यूजपेटी नवीन बसवण्यात आली. त्यामुळे पद्मावती नगर, कडवस्ती परिसरात शुक्रवारी (दि. 4) गुल झालेली “बत्ती’ थेट शनिवारी (दि. 12) आली. तब्बल नवव्या दिवशी परिसरात वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी “प्रभात’चे आभार मानले आहेत.
चिंबळी (ता. खेड) येथील पद्मावती व कडवस्ती रस्त्यावर 100 एचपीचे रोहित्र शुक्रवारी (दि. 4) पहिल्यांदा जळाले त्यानंतर रविवारी (दि. 6) नवीन रोहित्र बसवण्यात आले, ते तात्काळ जळाले तर सोमवारी (दि. 7) बसवण्यात आलेले रोहित्र मंगळवारी (दि. 8) पुन्हा जळाल्याने नागरिकांनी महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केला होता. त्यामुळे गेल्या नऊ दिवसांपासून पद्मावती नगर, कडवास्ती अंधारात होती तर पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली होती.
दरम्यान, या परिसरात रात्रीच्यावेळी आकडा टाकून सर्रास वीजचोरी केली जाते. तर औद्योगिक वसाहत वाढल्याने मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग वाढले असून प्रत्येकाकडे बोअरवेल आहे. त्यामुळे वीज मोठ्याप्रमाणात वापरली जाते. मात्र, 100 एचपीचे रोहित्र हा लोड सहन करू शकत नसल्याने ते वारंवार जळत असल्याने येथील रोहित्राची क्षमता वाढवावी, तसेच फ्युजपेटीची दुरवस्था झाल्याने तीही बदलण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीबाबत आमदार दिलीप मोहिते यांनी महावितरणशी संपर्क साधून जादा क्षमतेचे रोहित्र बसवण्याचे सांगितले होते. त्यास महावितरणने सकारात्मक प्रतिसाद देत अखेर येथे 200 एचपीच्या रोहित्रासह नवीन फ्यूज पेटी बसवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जादा क्षमतेचे रोहित्र व नवीन फ्यूज पेटीसाठी माजी सभापती विलास कातोरे, माजी सरपंच विजय जगनाडे, अर्जुन अवघडे, महावितरणचे कर्मचारी गणेश गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.