सातारा -“”मी नाही… मी नाही… करणाऱ्यांनी सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचे अतोनात नुकसान केले. शून्य आकारात स्टेडियम बांधले की व्यापारी संकुल? ज्यांनी हे पाप केले अशा तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या व पालकमंत्र्यांच्या मुस्काटात लावली पाहिजे,” असे खळबळजनक वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे केले. क्रीडा क्षेत्रातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर येथील विश्रामगृहात उदयनराजे यांनी आपल्या संतप्त भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या.
उदयनराजे म्हणाले, “”ज्यांनी सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचे वाटोळे केले, अशा तत्कालीन व्यक्तींची नावे घेण्याचीसुद्धा माझी इच्छा नाही. त्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचं वाटोळं केलं. मोक्याच्या जागा सातारकरांनी गमाविल्याने साताऱ्याच्या क्रीडा परंपरेला मोठा धक्का बसला आहे. स्टेडियमचा धावमार्ग आयताकृती लागतो हा तर गोल स्वरूपाचा आहे. जोड्याने मारलं पाहिजे. ज्या पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी मला विरोध केला आणि कारण नसताना मी विरोध करत आहे, असे दाखवले.
हे कोणी केले आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे नाव घेतले तर माझ्या तोंडातून घाण वास मारेल. म्हणून मी नाव पण घेत नाही. हे लोक जोड्यापुढे उभे करायच्या लायकीचे नाहीत. सगळीकडे घाण. साधे तुम्ही रणजी ट्रॉफीचे सामने घेऊ शकत नाहीत. यांनी सातारकरांना संपूर्ण झिरो करायचेच ठरवले आहे. त्याला आयताकृती मैदान लागते.’ ते कुठून करायचे, असा सवाल उदयनराजेंनी केला आहे. त्याकाळी शाहू स्टेडियमवर रणजी ट्रॉफी भरवल्या जात होत्या. मात्र, आता भरवता येत नाहीत.
ज्या बी. जी. शिर्के यांच्यासारख्या व्यक्तींनी बालेवाडी स्टेडियम बनवले अशा मोठ्या उद्योगपतीने या ठिकाणी टेंडरसाठी अर्ज भरले होते. त्यांना नाकारले. हे सर्व समोर येणे गरजेचे आहे. त्यावेळच्या साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावे. प्रत्येक वेळेस मी नाही असं सांगितलं जातं, यांना जोड्याने मारलं पाहिजे. स्टेडियमचे टेंडर काढले असताना स्टेडियमच्या बाहेरून गाळे कसे बनवले, असा सवाल उदयनराजे यांनी केला.