दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे आजारांमध्ये वाढ
टायफॉईडचे रुग्ण वाढले : आरोग्य केंद्रातील पथकाची धावपळ सुरू
थेऊर (वार्ताहर) – दूषित पाण्यामुळे थेऊर व लगतच्या परिसरात टायफॉईडचे रुग्ण वाढले आहेत. थेऊर परिसर तापाने फणफणला असून आरोग्य केंद्रातील पथकाची धावपळ सुरू झाल्याने प्रशासनाला जाग आली आहे. थेऊर परिसरात नळ पाणीपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत असलेली पाइप लाइन विहीर ते पाण्याची टाकी यादरम्यान सुमारे 5 ते 7 ठिकाणी तुटलेली व त्यातून पाणी बाहेर पडत असलेले निदर्शनास आले आहे. ही पाइपलाइन थेऊर रस्त्यालगत आहे. तुटलेल्या ठिकाणी दूषित पाणी मिळसल्याने नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा घरोघरी होत आहे. त्यामुळे या भागात अनेक साथीचे रोग पसरले आहेत. त्यामुले प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. नारगिकांना पुरवले जाणारे दूषित पाणी पिल्यामुळे अनेकांना तापाची लागण झाली आहे.
तालुका आरोग्य विभागाचे वतीने पथके नियुक्त केली आहेत. ही पथके घरोघरी जाऊन पाणी व रुग्णांची तपासणी करणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून विविध ठिकाणांचे पाण्याचे नमूने घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथील उपविभागीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
– डॉ. सचिन खरात, तालुका आरोग्य अधिकारी
नागरिकांनी घाबरून न जाता उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे. याठिकाणी तपासणी व उपचार मोफत होतात. तसेच पिण्याचे पाणी उकळून प्यावे, दूषित, शिळे आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.
– डॉ. एम. यू. लुकडे, आरोग्य अधिकारी, कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र
सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने केसनंद ते पुणे – सोलापूर महामार्गापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना पाइप लाइन ठिकठिकाणी तुटलेली आहे. हे सत्य असले तरी आम्ही ग्रामस्थांना पिण्यासाठी रो-प्लॅन्टमध्ये शुद्ध करूनच पाण्याचा पुरवठा करतो. या प्लॅन्टचे फिल्टर जानेवारी महिन्यातच बदलण्यात आले असून संशयाला जागा राहू नये म्हणून आम्ही हे पाणी तपासणीसाठी पाठवत आहोत.
– बाळासाहेब कांबळे, ग्रामविकास अधिकारी