मुंबई – दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी आल्यावर भारतीय कसोटी संघात मोठे दोन बदल केले जाणार असल्याचे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना कसोटी संघातून डच्चू दिला जाणार असून शुभमन गिल व हनुमा विहारी यांना कसोटी संघात स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
या कसोटी मालिकेत रहाणेने केवळ 22.66 च्या सरासरीने 136 धावा केल्या आहेत. तर पुजाराने 20.66 च्या सरासरीने 124 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला 2-1 असा पराभव पत्करावा लागल्यावर निवड समितीने पुजारा व रहाणेला नारळ देण्याचे संकेत दिले आहेत. आता मायदेशात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुभमन गिल आणि हनुमा विहारीला निवड समिती संधी देऊ शकते.
कोहलीनेच दिला इशारा
विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने रहाणे आणि पुजाराचा सातत्याने बचाव केला, पण केपटाऊनवर झालेल्या पराभवानंतर कोहलीला पत्रकार परिषदेत दोघांच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याच्याकडेही या प्रश्नाचे उत्तर नव्हते. इथे बसून मी ठरवू शकत नाही. ते निवड समितीचे काम आहे. आम्ही पुजारा आणि रहाणेचे समर्थन केले. मात्र, निवड समितीच्या मनात काय असेल? त्याबद्दल मी बोलू शकत नाही, असे मत कोहलीने व्यक्त केले होते. हाच या दोघांबाबत निवड समिती धक्कादायक विचार केल्याचा इशारा कोहलीने दिल्याचे बोलले जात आहे.
श्रीलंकेविरुद्ध होणार मोठे बदल
आता भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यात निवड समिती भारतीय संघात मोठे बदल करणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या 25 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत रहाणे आणि पुजाराला संधी मिळणार नाही. या मालिकेत शुभमन गिल मधल्या फळीत खेळणार आहे. दुसऱ्या जागेवर हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर या दोघांपैकी एकाला संधी दिली जाईल. रोहित शर्मा सुद्धा या कसोटी मालिकेत खेळणार आहे. तो सलामीवीर मयंक अग्रवालच्या जागी संघात परतेल.