अनेक ठिकाणच्या तापमानात 3 ते 4 अंशांनी घट
पुणे – पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या हवामानात बदल होऊ लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमध्ये वाढ झाल्याने राज्यात थंडी वाढली आहे. अनेक ठिकाणच्या तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान नागपूर येथे 14.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. किमान तापमान घटल्यानंतर निरभ्र आकाशामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे.
तापमानात चढ-उतार सुरू असताना शुक्रवारपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रातील किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही तापमानात 1 ते 2 अंशानी तापमान कमी होत आहे.
उत्तर भारतातील राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. मंगळवारी हरियानातील हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांक 9.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंड वाऱ्याचे प्रवाह दक्षिणेकडे येण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारपर्यंत पूर्व आणि मध्य भारतातील राज्यामध्ये तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.