हैदराबाद : हैदराबादमधील चारमिनार शेजारील मुस्लिम वस्तीत पोलिसांनी नाकाबंदी केली. प्रत्येक घरात जाऊन आधार कार्ड आणि वाहन नोंदणी कागदपत्रांची मागणी केली. मुले त्यांची शाळा, घराची मालकी याबाबत माहिती घेतली.
पोलिसांनी एलबी नगर भागात नऊ नोव्हेंबर रोजी नाकाबंदी केली. तिखट, हळद आणि मसाल्याचे पदार्थ विकणाऱ्यांकडील माल जप्त केला. त्यांना अटक केली. अशा कारवाईमुळेच गुन्ह्याच्या संख्येत गेल्या वर्षी घट झाल्याचे पोलिसांनी त्यांच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.
पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर स्थानिक आमदार मुमताझ अहमद खान यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. त्यावेळी पोलिस आणि खान यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर 70 पोलिसांचा फौजफाटा तेथून काढून घेण्यात आला.
घरात पुरूष माणूस नसताना पोलिस येत असल्याने महिला घाबरतात. पुरूच कामधंद्यासाठी बाहेर पडल्यावर पोलिस येत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी या प्रकाराबद्दल एकही शब्द न काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खासदार व्यंकट रेड्डी यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. ओवेसी यांनी या घटनेचा निषेध का केला नाही,असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, एमआयएमचे लोकप्रतिनिधी असलेल्या भागात मुस्लिमांना त्रास दिला जात आहे. मात्र त्याबद्दल का बोलले जात नाही? ओवेसी यांना सगळीकडे नाटकं करत फिरायची हौस आहे. त्यांना मुस्लिमांची स्थिती सुधारण्यात कोणतेही स्वारस्य नाही. ते याबाबत का बोलत नाहीत, असा सावाल रेड्डी यांनी केला.
दरम्यान, पोलिसांनी हा नेहमीच्या कारवाईचा भाग असल्याचे सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी ती करण्यात येत असल्याचा दावा केला. मात्र पोलिसांची ही कारवाई बेकायदा आहे,असे सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. नाकाबंदी आणि शोध मोहीम हे लष्कराच्या कारवाईची पध्दत आहे. ती जम्मू काश्मिर आणि नक्षलवादी भागात राबवली जाते. अन्यत्र पोलिस अशी मोहीम राबवत नाहीत, असे या संघटनांचे म्हणणे आहे.