नगर – मानवसेवेच्या संस्कारातून आनंदधाम येथे सुरु असलेले अन्नछत्राचे कार्य साधूसंतांना अभिप्रेत असलेली सेवा आहे. याठिकाणी सर्वसामान्यांना अवघ्या दहा रुपयात सकस भोजन मिळते. आनंदधाम हे सुसंस्कारांचे केंद्र आहे. या अतिशय पवित्र परिसरात आनंदधाम फाउंडेशन अन्नपूर्णेच्या रुपाने सर्वांना प्रेमाचा घास भरवत आहे.
सध्या पवित्र चातुर्मास सुरु असून याकाळात अध्यात्माची शिकवण ऊर्जा देत असते. चांगले कर्म करण्याची प्रेरणाच साधूसंतांचे विचार देतात. त्यामुळेच वंचित, गरजूंची सेवा घडते, असे प्रतिपादन जय आनंद महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी केले.
करोनाकाळात कडक लॉकडाऊन असताना गोरगरीब, वंचित, बेघर, प्रवासी यांना मायेचा घास भरवून त्यांना नवी उमेद देण्याचे कार्य करणाऱ्या आनंदधाम फाउंडेशनने जून महिन्याच्या सुरुवातीपासून आनंदधाम परिसरात फक्त दहा रुपयात सर्वांसाठी सकस भोजन उपलब्ध करून दिले आहे. दोन महिन्यांपासून हे कार्य अविरत सुरु असून सध्या सुरु असलेल्या चातुर्मासानिमित्त जय आनंद महावीर युवक मंडळाने या कार्याला आर्थिक मदत केली आहे.
ही मदत सुपुर्द करतेवेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, आनंदधाम फाउंडेशनचे अभय लुणिया, आनंद चोपडा, जय आनंद महावीर युवक मंडळाचे बाबालाल गांधी, अजित गांधी, सत्येन मुथा, अमित गांधी, योगेश मुनोत उपस्थित होते.
यावेळी लुणिया म्हणाले, आनंदधाम येथे दररोज सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत ही अन्नसेवा सुरु आहे.
दरवर्षी चातुमार्सात आनंदधाम येथे विविध माध्यमातून सेवाकार्य केले जाते. यंदाही अन्नछत्राच्या रुपाने हे कार्य चालूच ठेवण्यात आले आहे. कोविड काळात या मंडळाने गरजूंना तसेच कोविड केअर सेंटरला मदत केली आहे. नावाप्रमाणेच भगवान महावीर स्वामी, आचार्यश्रींची शिकवण हे मंडळ आचरणात आणत आहे. शेवटी अमित गांधी यांनी आभार मानले.