माणसाच्या अंगी जर एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा असेल आणि त्याला जर सचोटीची, प्रयत्नांची जोड लाभली तर तो कोणत्याही-कोणाच्याही आधाराशिवाय, मदतीशिवाय आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. अभिनेत्री श्रद्धा जैस्वालने ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. सध्या ती स्टार भारत चॅनेलवरील “कार्तिक पौर्णिमा’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका करत आहे.
विशेष म्हणजे श्रद्धाही कोणत्याही सिनेघराण्यातून किंवा सौंदर्य स्पर्धांमधून किंवा मॉडेलिंगच्या क्षेत्रातून आलेली नाही. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ती कोलकात्यामध्ये एक कॉम्प्युटर टीचर म्हणून कार्यरत होती. मोठ्या कंपन्यांमधील 50 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याचे काम ती करायची. जेणेकरून त्या लोकांना ऑफिसमध्ये काम करताना अडचणी येऊ नयेत! त्यावेळी काही जणांनी तिला “तू अभिनयाच्या क्षेत्रात जा’ असे सुचवले आणि सांगितले.
श्रद्धा सांगते, मी सुरुवातीला खूप लाईटली घेतलं, पण नंतर अनेकांकडून असे सांगितले जाऊ लागल्यानंतर मीही विचार करू लागले. माझ्यातही अभिनेत्री बनण्याची इच्छा तीव्र होऊ लागली. मग एके दिवशी अचानक मी नोकरी सोडली आणि कोलकात्याहून मुंबईला आले. इथे आल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑडिशनची साईट शोधली. अशाच प्रयत्नांमधून मला काही संधी मिळू लागल्या.
एके दिवशी अचानक “कार्तिक पौर्णिमा’ या मालिकेतील महत्त्वाच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली आणि मी तो प्रस्ताव स्वीकारला. आज इतक्या मेहनतीनं मी ही भूमिका करते आहे. पण माझी मेहनत फळाला येत आहे.