पुणे – दक्षिण आशियातील एटीपी टूर स्पर्धांपैकी एक असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या चौथ्या मालिकेत अव्वल 100 खेळाडूंमधील जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानी असलेल्या ऐसलेन केरस्तेव, गतविजेत्या जेरी व्हेसली यासंह अन्य सात खेळाडू एकेरीत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे 31जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.
आशियातील सर्वात जुन्या टेनिस स्पर्धांपैकी एक असलेली ही स्पर्धा 26व्या वर्षात पदार्पण करत असून कोविड- 19च्या महामारीमुळे एक वर्षाच्या विश्रांतीनंतर ही स्पर्धा होत आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेला महाराष्ट्र सरकार यांच्या संलग्नतेने टाटा समूह यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
28 वर्षीय रशियाच्या ऐसलेन केरस्तेवने 2021मध्ये लक्षवेधी कामगिरी केली असून त्याने याआधी ऑस्ट्रेलियाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तसेच, ऐसलेन याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीत अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविचला पराभूत करून पहिलेवहिले विजेतेपद पटकावले होते. याशिवाय मिश्र दुहेरीत त्याने रौप्य पदक पटकावले होते. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या डॅनिल मेदवेदेव याच्याकडून एटीपी कप 2021स्पर्धे दरम्यान रशियाचे राखीव अस्त्र म्हणून ओळख मिळालेला कारात्सेव या वेळी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या पदार्पणातच आपली छाप पाडायला उत्सुक असेल.
टाटा ओपन महाराष्ट्र या स्पर्धेचे आयोजन पुन्हा एकदा करत असल्याचे जाहिर करताना आम्हाला आनंद होत आहे. जगभरातील अनेक नामांकित खेळाडू आतापर्यंत या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या वेळे देखिल ही परंपरा कायम राहणार आहे. कोविड 19चे आव्हान असूनही या स्पर्धेत खेळण्यासाठी जगभरातील अनेक प्रमुख खेळाडूंनी खेळण्याची तयारी दर्शविली असल्याचे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वोत्तम दर्जाचे टेनिस पाहायला मिळणार आहे, असे टाटा ओपन महाराष्ट्रचे संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले.
ही स्पर्धा पुन्हा सुरु होण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. यासाठी सर्व भागीदारांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. स्पर्धेचे आयोजन करताना समोर असलेल्या आव्हानांची आम्हाला कल्पना आहे. पण, आम्ही त्यांचा सामना करण्यास समर्थ आहोत, असे एमएसएलटीएचे सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले.