वडूज/मायणी (प्रतिनिधी) – मायणी परिसराचा शेती पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील तत्कालीन भाजपच्या राज्यकर्त्यांकडे शासनस्तरावर पाठपुरावा केला. मायणी येथे गेल्या वर्षी तत्कालीन पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, पशुधन विकास मंत्री महादेव जानकर या चार मंत्र्यांच्या दौऱ्यामुळेच तारळी योजनेस खऱ्या अर्थाने चालना मिळाली, असे मत माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी व्यक्त केले.
मायणी येथील पडळकर तलाव, माळीनगर तलाव व खडकाचा मळा तलाव येथे पोहचलेल्या तारळी योजनेच्या पाण्याचे पूजन महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर डॉ. येळगावकर यांनी ही माहिती दिली. यावेळी युवा नेते सचिन गुदगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, डॉ. सौ. उर्मिला येळगावकर, उपसरपंच आनंदराव शेवाळे, महादेव ढवळे, नितीन पडळकरा, अभिजित काबुगडे, मानसी तोरो, रेणू येळगावकर, सौ. चन्ने, सीता कचरे आदी उपस्थित होते. डॉ. येळगावकर म्हणाले, “मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी धोंडेवाडी उड्डाण पुलाचे काम बंद होते.
यासंदर्भात आपण मंत्रीमहोदयांना कल्पना दिली.’ हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनीही तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून चांगला पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. सचिन गुदगे म्हणाले, “मायणी परिसराला उरमोडी, तारळीचे पाणी मिळावे ही स्व. भाऊसाहेब गुदगे यांची तळमळ होती. डॉ. येळगावकर यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली. ही आपल्या दृष्टीने समाधानाची बाजू आहे.’ राजू कचरे यांनी सूत्रसंचालन केले. मोहन दगडे यांनी आभार मानले.