प्रा.डी.के.वैद्य
भांगरेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन; पुत्रालाही केले प्रोजेक्ट
अकोले – अकोलेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेच्या निमित्ताने अशोक भांगरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.पिचडांवर निशाणा, पण त्यांचा नेम मात्र विखे पाटलांवर राहिला. या शक्तिप्रदर्शनात भांगरे यांनी मुलगा अमित यालाही यांनी प्रोजेक्ट केले. त्यामुळे भविष्यात सुद्धा पिचड-भांगरे हा लढा अटळ आहे.
या सभेला अकोले तालुक्यातील साडेतीनशे वाहनांच्या माध्यमातून व पठार भागातील दीडशे वाहनांच्या माध्यमातून भांगरे व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने लोक गोळा केले होते. विशेष बाब म्हणजे या सभेत युवकांचा मोठा भरणा होता. आदिवासी पट्ट्यातील युवक पठार भागावरील युवक आणि एकेकाळचे पिचड यांचे खंदे समर्थक राहिलेले कार्यकर्ते या सभेत उपस्थित राहिल्याने या सभेद्वारे भांगरे यांनी आपली राजकीय ताकदपणाला लावून मोठे शक्तिप्रदर्शन केले.
पिचड यांना 1980 साली कॉंग्रेसमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेतलेले व कॉंग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवलेले रंगनाथ पाटील वाकचौरे हे या सभेला उपस्थित राहिले.
तर पिचड यांचे राजकीय विरोधक दशरथ सावंत यांची उपस्थिती विशेष नोंद घेण्याजोगी राहिली. या सभेचे मोजमाप मुख्यमंत्र्याच्या सभेशी लावले गेले. अकोलेत मुख्यमंत्र्यांची अलीकडेच जाहीर सभा झाली होती आणि आयटीआयच्या मैदानावर झालेल्या सभेला जो प्रतिसाद मिळाला. त्याच्या जवळपास नसेल पण मोठा प्रतिसाद या सभेला मिळाला, अशी येथे चर्चा सुरू आहे.
भांगरे यांनी यानिमित्ताने, मी कधीही उमेदवार म्हणून या निवडणुकीत पुढे येणार नाही, असे सांगताना शेवटच्या श्वासापर्यंत पिचड पिता-पुत्रांचा आपला विरोध शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील असा निर्वाळा दिला. शिवाय आपला सातबारा तपासा. जमीन विकलेली सात बारावर दिसेल. आपण आजही कर्जबाजारी आहोत व कोणत्या पद्धतीने राजकीय वाटचाल करीत आहे, याचे दर्शन सर्वांना घडेल. स्वतःची जमीन विकून मी समाजकार्य करीत आहे. राजकीय आघाडी लढवीत आहे असा त्यांचा यावेळेस बोलण्याचा रोख होता.
पिचड यांच्यावर टीकास्त्र सोडताना “गारुडी’ प्रत्येक निवडणुकीत वेगळा फंडा वापरणारा’ “नुरा कुस्ती लावणारा’ आणि कारखाना, दूध संघ तोट्यात ठेवून आपला प्रपंच विस्तार करणारा असा मोजक्या शब्दांमध्ये त्यांनी हल्लाबोल केला. पण पिचड यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्या खरा रोख किंवा नेम हा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर होता. ना. विखे पाटील, तत्पूर्वी दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या कुटुंबाशी भांगरे कुटुंबाचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. त्यामुळे यापूर्वी पक्ष जरी बदलला तरीही भांगरे यांनी आपली कौटुंबिक जिव्हाळ्याची निष्ठा विखे कुटुंबाप्रती कायम ठेवली. यावेळेला मात्र चित्र पूर्णपणे बदललेले दिसले विखे-पाटील यांची संभावना “छत्री वाले’ अशा शब्दात करून विखे यांच्यावर भांगरे यांनी एकेरीवर येत टीका केली.
निवडणूक निकाल 12-0 लागेल अशा प्रकारची भाषा वापर करणाऱ्या विखे यांना भांगरे यांनी उघड आव्हान दिले. जिल्ह्यामध्ये तुमचे सहा उमेदवार निवडून आणले तरीही भरपूर होतील असे आव्हान दिले. भांगरे यांनी विखे पाटील यांच्या एकूणच अकोले तालुक्यातील राजकीय हस्तक्षेपाबाबत जोरदार आणि तीव्र स्वरूपाची टीका केली. विखे पाटील यांचा “छत्री वाले’ असा उल्लेख करताना अकोल्यातील विखे-पाटील यांचा शिरकाव म्हणजे अकोल्याचे पाणी विखे यांना शिर्डीला चोरून न्यायचे आहे. पळवून न्यायचे आहे. याला आपण कधीही अनुमती देणार नाही. याच्या विरोधात आपण व अकोले तालुका दंड थोपटल्या शिवाय राहणार नाही, असा अभिप्रेत इशारा त्यांनी यानिमित्ताने दिला. शिवाय त्यांच्या एकूणच असणाऱ्या “गोड’ व “स्नेहमय’ नात्याची असणारी बंधने त्यांनी झुगारून दिली असल्याचे या निमित्ताने पुढे आले.
या सभेत आणखीही एक चित्र पुढे आले ते म्हणजे पठार भागातील मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिलेल्या मतदारांची व युवकांची संख्या. ही बाब सामान्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. याचा दुसरा अर्थही लावला जातो आहे. तो म्हणजे राज्याचे माजीमंत्री व “भाईचारा’चे नाते जपणारे बाळासाहेब थोरात यांनीही आता पिचड विरोधाची पावले टाकण्यास सुरुवात केली असल्याचे आणि पठार भागावरील असणारे मतदार अजित पवारांच्या सभेला आणण्यासाठी हातभार लावल्याचे दिसून आले.
अमित भांगरे हा त्यांचा मुलगा परदेशी शिक्षणासाठी होता. यानिमित्ताने भांगरे यांनी अमित यालाही “प्रोजेक्ट’ केले. विशेष बाब अशी की त्यानेही पिचड पिता पुत्रांवर हल्लाबोल करताना आपल्या बापाने 70 एकर जमीन विकून समाजकार्य केले. राजकारण केले. पण कुणालाही फसवले नाही. असे यानिमित्ताने जनतेच्या समोर उघड केले. तो एक फर्डा वक्ता आणि उद्याचा आघाडीचा चेहरा ठरणार हे नक्की. त्याला असणारी पणजोबा, आजोबा, वडील, आई यांची राजकीय पार्श्वभूमी प्राप्त झालेली आहे. शिवाय आबालवृद्धांशी त्याचा सुसंवाद चांगला आहे. या गोष्टींमुळे तो आज तरी सामान्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याची राजकीय कारकीर्द 23 सप्टेंबरला सुरू झाली असे त्याने स्वतः जाहीर केले. या सभेला शिवसेनेचे म्हणून जे एकास एक उमेदवार देण्याची भाषा करणारे विधानसभेचे इच्छुक दावेदारांनी मात्र या सभेला दांडी मारली. याचीही या वेळेस जोरदार चर्चा राहिली.