जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची घेतली भेट
नगर – ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकरला मंजुरी मिळावी, यासाठी सादर करण्यात येणारे प्रस्ताव चोवीस तासांत मंजूर करावेत, तसेच पाणीवाटप करताना प्रती व्यक्ती वीस लिटर ऐवजी पन्नास लिटर पाणी द्यावे, ज्या गावांमध्ये चारा छावण्या सुरू झाल्या नाहीत, त्या गावातील जनावरांना पाण्यासाठी टॅंकर मंजूर करावेत, अशी मागणी नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.
सध्या जिल्ह्यात 700 च्यावर टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नगर तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असून, तालुक्यात 57 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच घोसपुरी योजनेतून 18 गावे व बुऱ्हाणनगर योजनेतून 39 गावांना पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर असून, छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरे आहेत. मात्र, अद्यापही नगर तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये चारा छावण्या सुरू झाल्या नाहीत.
जाचक अटींमुळे छावण्या सुरू करण्यासाठी कोणी धजावत नाही. पण ज्या गावांत छावण्या नाहीत, त्या गावातील पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्या गावात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. मात्र, टॅंकरचे प्रस्ताव हे प्रशासन किरकोळ त्रुटी काढून नामंजूर केले जात आहेत. तरी या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही भोर यांनी केली आहे.