नवी दिल्ली : काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांमध्ये अजिबात सहभागी होणार नाही. दुसऱ्या देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करणार नाही असे तालिबानने स्पष्ट केले आहे. तालिबानच्या या निर्णयाने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने या विषयी माहिती दिली आहे.
काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाला तालिबान पाठिंबा देणार, असे दावे सोशल मीडियावरुन करण्यात येत होते. सोमवारी हे सर्व दावे तालिबानने फेटाळून लावले. तालिबानची ही भूमिका पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे. कारण तालिबान आणि पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून दृढ मैत्रीचे संबंध आहेत. अफगाणिस्तानात दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानने नेहमीच तालिबानचा वापर केला आहे.
तालिबान काश्मीरमधल्या जिहादमध्ये सहभागी होणार, हे मीडियामध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार आणि चुकीचे आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. दुसऱ्या देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही असे सुहैल शाहीन याने सांगितले. तो अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रवक्ता आहे. काश्मीर वादावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत भारताशी मैत्री होऊ शकत नाही असे तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्लाह मुजाहीदने म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर काश्मीरसंबंधी मोठ्या प्रमाणावर पोस्ट फिरत असल्याचे सोशल मीडिया मॉनिटर करणाऱ्या टीमच्या लक्षात आले. त्या पार्श्वभूमीवर आता तालिबानच्या प्रवक्त्यानेच खंडन केले आहे.
प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झालेलं वृत्त आणि सोशल मीडियावर सुरु असलेली चर्चा यामुळे तालिबानची भारताबद्दलची भूमिका बदलली आहे का? हे जाणून घेण्यात आले. त्यासाठी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यानंतर तालिबानकडून हे अधिकृत स्पष्टीकरण समोर आले. काबूल आणि दिल्लीतील राजनैतिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सोशल मीडियावरील पोस्ट बनावट असून ती तालिबानची भूमिका नाही असे स्पष्ट करण्यात आले.