पुणे – लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाल्यामुळे दररोज मोदक, बर्फी, लाडू, गुलाबजाम यासह विविध गोड पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. मात्र, हा आस्वाद घेताना जरा आरोग्याचीही काळजी घ्या. विशेषत, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्या “भक्तांनो’ गोड खाताना “थोडं कंट्रोल’ करा, असा “तिखट-गोड’सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
श्रावण संपताच लाडक्या गणरायाच्या आगमनाने उत्सवाला सुरवात होते. गणपती, पित्रुपंधरवडा, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि तुळशीचे लग्न असे एकापाठोपाठ येणाऱ्या सण-उत्सवामुळे पुढील तीन महिने गोड-धोड खाण्याचे प्रमाण अधिक असते. गणपतीमध्ये सर्वांचे आवडते असलेले मोदक समोर येताच पटकन खाल्ले जाते. या दिवसात मित्र आणि नातेवाईकांकडून केलेला आग्रही मोडता येत नाही. त्यामुळे गोडाचे प्रमाण वाढते आणि आरोग्याचा समस्या सुरू होतात. मधुमेह असलेल्या रुग्णांना तर अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मधुमेह व्यक्तींनी खाताना नैसर्गिक गोडपणा असलेले पदार्थ निवडावे. साखरेऐवजी गुळ, खजूर किंवा अंजीर. गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते आणि शरीरातून घातक टॉक्सिन्स बाहेर टाकून लिव्हर स्वच्छ करण्यासाठी गुळामुळे मदत होते. तसेच, खजूर व अंजीर अतिशय आरोग्यदायी आहेत व शरीराला ऊर्जा देणारे आहेत.
या काळामध्ये लहान मुलांनाही योग्य प्रमाणातच गोड पदार्थ द्यावे. गोडाचे प्रमाण अधिक झाल्यावर दात किडणे, पोटदुखी याचे त्रास होता. सण-उत्सवामध्ये मोदकासह मिठाईला मोठी मागणी असते. त्यामुळे खाद्यपदार्थ बनवणाऱ्या व्यावसायिकांकडून बनावट मैदा, खावा, विविध खायचे रंग याचा दुषीत किंवा अतिवापर होण्याची शक्यता अधिक असते. तसेच दुषीत पाणी वापरणे आणि अस्वच्छता यामुळे त्या मिठाईचा दर्जा चांगला नसतो. ही मिठाई आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे पोटदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या, अशक्तपणा येणे असे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे शक्यता असे पदार्थ प्रसाद म्हणून वाटप करणे किंवा खाणे टाळावे. चांगल्या ठिकाणाहूनच हे पदार्थ घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
“निरोगी जीवनशैली अंगिकारताना काळजी घ्या’
केवळ सणासुदीच्या वेळीच नाही, तर संपूर्ण वर्षभर आरोग्याविषयी जागरुक राहाणे आवश्यक आहे. शारीरिक हालचाली असलेली दैनंदिनी आणि नियमित व्यायाम असल्यास आपण फिट राहू. तणाव येणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. सणांमध्ये जास्त खाण्याऐवजी कमी प्रमाणात खावे. त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तीची ब्लड शुगर पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. वेळोवेळी आरोग्याची तपासणी करावी.