वसई : पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या सहा आदिवासी महिलांना चोर समजून बेदम मारहाण केल्या प्रकणी पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाची खाते निहाय चौकशी करून यापुढील कारवाई करू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
पोलिसांनी काही दिवसापूर्वी सहा आदिवासी महिलांना चोर समजून त्यांना ताब्यात घेतले होते.तसेच त्यांना मारहाणदेखील केली तसेच चूक लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्यांना ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली नाही, अशी माहिती आदिवसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. याच प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांचे अखेर निलंबन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यातील कासा परिसरात राहणाऱ्या बेबी नारायण वावरे, दीपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर, सीता संताराम भोईर, तारूसुभाष डोकफोडे या सहा आदिवासी महिला वसईच्या पापडी तलाव, कोळीवाडा या ठिकाणी राहतात आणि मोलमजुरीचे काम करतात. या महिला शुक्रवारी पापडी येथे बाजारात गेल्या होत्या. बाजारहाट करताना काही नागरिकांनी त्या चोरी करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या महिलांना पापडी येथील पोलीस चौकीत नेले.
तेथील सहायक पोलीस निरीक्षक विनोद वाघ आणि अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना लाठीने मारहाण करून पुन्हा बाजारात दिसू नका, अशी धमकी दिली. या महिलांनी या संदर्भात आदिवासी संघटनांना माहिती दिली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला असता केवळ समज देण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना मारहाण केली नसल्याचा दावा पोलिसांनी केला होता.