शिवसेनेचा शाब्दिक बाण: काश्मीरमधील रक्तपात, महाराष्ट्रातील आक्रोश अस्वस्थ करणारा
मुंबई : सर्जिकल स्ट्राईक केल्यावर पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मनोबल खचेल हा भ्रम ठरला आहे. उलट, काश्मीरमधील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काश्मीरमधील रक्तपात आणि महाराष्ट्रात होणारा हुतात्मा जवानांच्या कुटूंबीयांचा आक्रोश अस्वस्थ करणारा आहे, अशा शब्दांत शिवसेनेकडून पुन्हा मोदी सरकारवर शाब्दिक बाण सोडण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरात नुकत्याच झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईवेळी दोन जवानांना वीरमरण आले. हौतात्म्य पत्करलेल्यांमध्ये महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एका जवानाचाही समावेश आहे. त्याचा संदर्भ देऊन शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून मोदी सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे.
जवानांच्या वीरमरणामुळे काश्मीरात नवीन वर्षाचा प्रारंभ काही चांगला झाला नाही. गेल्या महिनाभरात महाराष्ट्रातील सात ते आठ जवानांना वीरमरण आले. त्या घडामोडींना महाराष्ट्रातील सत्तारूढ आघाडी जबाबदार नाही.
जम्मू-काश्मीरमधील स्थिती नियंत्रणात असल्याचे वारंवार सांगितले जाते. पण ते किती सत्य आहे? सर्जिकल स्ट्राईक करूनही काश्मीरमधील स्थिती सुधारली काय? दहशतवादी हल्ले चालूच आहेत. पण, त्याविषयीच्या बातम्या देण्यावर नियंत्रण आहे, असा टोमणा अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.