नवी दिल्ली – राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा विषय सध्या चर्चेत आहे. यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. दरम्यान, आज या नामांतराविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार असल्याने आम्ही ही याचिका ऐकून घेणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे नामांतरविरोधी संघटनांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रक्रियेला मंजुरी दिली होती. मात्र, नामांतरविरोधी संघटनांनी याला विरोध करत कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती.