विविध आजार ः 15 दिवसांत 420 प्राण्यांवर उपचार
पिंपरी – उन्हाच्या वाढत्या तडाख्याचा माणसांना तर त्रास होत आहेच. मात्र पाळीव प्राण्यांना देखील विविध आजार यामुळे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात मागील 15 दिवसांत 420 प्राण्यांवर उपचार करण्यात आले आहेत.
उन्हाळ्याच्या पाठोपाठच आजारांचे संकट येते. माणसांसह प्राण्यांनाही उन्हाळ्यात विविध आजारांना सामोरे जावे लागते. महापालिकेच्या पशूवैद्यकीय पिंपरी व प्राधिकरणातील रुग्णालयांमध्ये मागील दीड महिन्यात उपचारासाठी येणाऱ्या प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एप्रिल महिन्यात 820 प्राण्यांवर उपचार करण्यात आले होते. तर 1 ते 15 मे या पंधरा दिवसांच्या कालावधीत 420 प्राण्यांवर उपचार करण्यात आले. उष्माघातासह विविध उन्हाळी आजार या प्राण्यांना झाले होते.
अधिक माहिती देताना महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे म्हणाले की, आपल्यापेक्षा प्राण्यांच्या शरिराचे तापमान अधिक असते. त्यामुळे त्यांना उन्हाशी सामना करणे अवघड होते. आपल्या प्रिय पाळीव प्राण्याचे उन्हापासून संरक्षण करणे ही आपली जबाबदारी असते. प्राण्यांना सावलीत ठेवावे. प्राण्यांना फिरायला नेताना उन्हाच्या वेळा सोडून इतर वेळी त्यांना बाहेर फिरावयास न्यावे.
प्राण्यांच्या शरिराचे तापमान कमी करण्यासाठी वेळोवेळी स्वच्छ आणि गार पाणी प्यायला देऊन शरिराचे तापमान कमी करता येते. त्यांच्याकडे घामाच्या ग्रंथी नसल्याने त्यांना त्यांच्या शरिराचे तापमान कमी करणे जिकीरीचे जाते. दर दोन ते तीन तासांनी स्वच्छ पाणी दिले तर प्राण्यांना त्रास होत नाही. गरज असल्यास नारळपाणी दिल्याचा देखील फायदा होतो. तसेच खाद्यपदार्थ देताना त्याचे प्रमाण कमी आणि ते ताजे असावे. ते ताजे नसेल तर ते अन्न खाऊन प्राणी आजारी पडतील. आपल्या प्राण्यांच्या सवयी आणि वेळा पाहून ताजे आणि सकस अन्न त्यांना द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.