सातारा – आधीच उशिरा सुरुवात झालेल्या पावसाने दहा-बारा दिवस जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. त्यानंतर चार दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली असून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे.
सुमारे 42 अंशाचा पारा झेलून हैराण झालेल्या जिल्हावासियांना पावसाने जूनअखेरीपर्यंत मोठी प्रतीक्षा करायला लावली. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात पडणारा एकही अवकाळी पाऊस यंदा जिल्ह्याच्या कोणत्याच भागात झाला नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळाने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती.
धरण परिसरात असणाऱ्या गावांमध्ये पाण्याचे संकट ओढावले होते तर धरणांनी तळ गाठला होता. त्यातच जून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला तरी आकाशात पावसाचे ढग दिसत नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पावसाची प्रतीक्षा संपली आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला.
दिवस रात्र पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्येही समाधानाचे वातावरण होते. काही शेतकऱ्यांनी पाऊस सुरु होण्यापूर्वी पेरण्या केल्या होत्या तर काहीजण पेरण्यांसाठी पाऊस थांबण्याची वाट बघत होते. आणि चार-पाच दिवसांपूर्वी पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी रखडलेल्या पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, आता पाऊसच गायब झाल्याने आणखी चिंता वाढली आहे.