दुष्काळाचा आगामी गाळप हंगामावर परिणाम : साखर आयुक्तालयाने व्यक्त केली शक्यता
पुणे – राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा परिणाम आगामी ऊस गाळप हंगामावर होण्याची शक्यता असून ऊस क्षेत्रामध्ये सुमारे 28 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज साखर आयुक्तालयाच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील गाळप हंगाम संपला असून नवीन हंगामास ऑक्टोंबरपासून सुरुवात होईल. आगामी गाळप हंगाम कसा असेल, याबाबत सोमवारी साखर आयुक्तालयाचे संचालक शेखर गायकवाड यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ज्यावर्षी दुष्काळ पडतो. त्याच्या दुसऱ्या वर्षी ऊस क्षेत्रात घट होत असते. यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या हंगामात पाहायला मिळतो. गतवर्षी राज्यातील तब्बल 11.62 लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. ते घटून 8.43 लाख हेक्टरपर्यत क्षेत्र खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 टक्क्यांनी ऊस क्षेत्र घटेल, असा अंदाज आहे.
ऊस क्षेत्र घटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर सुद्धा होण्याची शक्यता आहे. उसाचे उत्पादन हे 570 लाख मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. उत्पादनापाठोपाठ साखर निर्मिती सुद्धा घटून फक्त 65 लाख टन होण्याची शक्यता आहे. सरासरी 11.30 टक्के उतारा राहणार आहे. मराठवाड्यातील जिल्हे आणि सोलापूर याठिकाणी दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे ऊस पिकाखालील क्षेत्र घटले आहे. याशिवाय, चाऱ्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊसतोड होत असल्यामुळे ऊस क्षेत्र कमी होणार आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
राज्यात जूनपासून पाऊस सुरू होणार आहे; पण उसाचे क्षेत्र हे तीन वर्षांपासून ठरलेले असते.पाऊस जरी चांगला झाला तरी त्यात ऊस क्षेत्रात फार मोठी वाढ होईल, अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे आगामी वर्ष ऊस क्षेत्राच्या दृष्टीने फारसे दिलासादायक नसल्याचे दिसत आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
साखरेच्या निर्यातीवरही परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर कमी झाल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर झाला आहे. केंद्र सरकारने यंदा 50 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीसाठी मंजूर केली होती. पण, जेमतेम आतापर्यत 23 लाख मेट्रीक टन साखर प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. तर अजून साधारण 7 लाख मेट्रिक टन साखरेचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे यंदा निर्यात ही फक्त 30 लाख मेट्रिक टनापर्यत होईल. त्यातून महाराष्ट्रातून आतापर्यत 10 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात झाली आहे. महाराष्ट्रासाठी निर्यातीसाठीचा कोटा हा 15 लाख मेट्रिक टन इतका आहे. म्हणजे महाराष्ट्रातून सुद्धा निर्यात कमी होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडे सध्या मोठ्या प्रमाणावर साखरेचा स्टॉक शिल्लक आहे,असेही गायकवाड यांनी सांगितले.
… तर कारखान्यांना होणार फायदा
राज्यात रिटेलिंगमध्ये 10 कारखान्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये कारखान्यांकडून थेट ग्राहकांना साखर विक्री होत आहे. कारखान्यांना क्विंटलला 400 रुपये अधिक मिळत आहेत. वर्षभर अशीच साखर विक्री राहिल्यास कारखान्यांना निश्चित फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.