मुंबई – विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. नागपूर आणि पुणे या प्रतिष्ठेच्या झालेल्या लढतीत महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, धुळे, नंदुरबार विजय हा आश्चर्यकारक नाही. यामध्ये महत्वाची नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती. ती कॉग्रेसने जिंकली. हा निकाल महाविकासआघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडी सरकारच्या एकत्र कामाचे हे यश आहे. आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारले आहे.
तसेच, पुणे मतदार संघातही आम्हाला यश मिळवता आले नव्हते. परंतु, आज त्यापेक्षा वेगळा निकाल आला आहे. महाराष्ट्रातील चित्र बदलले आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांचा विनोदी विधान करण्याचा लौकिक आहे. मागच्या वेळेस विधान परिषदेला चंद्रकांतदादा कसे निवडून आले ते सर्वांना माहित आहे. तसेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला. त्यामुळे ते निवडून आले. त्यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ निवडला नसता, असा टोलाही शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.