मुंबई – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पाच्या तेरा दिवसाच्या कामकाजामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक विषयांवरूना गदारोळ झाल्याचे दिसून आले. तरी शिंदे-फडणवीस सरकारला गदारोळ होऊनही कामकाज सुरळीत सुरु ठेवण्यात यश मिळत आहे. यामुळे अनेक महत्त्वाचे विषय चर्चेला आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या, लव्ह जिहाद, कायदा सुव्यवस्था, रस्त्यांची कामे अशा विषयांवर सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. अनेकदा आमदारांनी वॉकआऊट केले, परंतु कामकाज थांबवण्यात आले नाही.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानसभा सभागृहात कांदा खरेदी आणि विक्रीवरुन जोरदार खडाजंगी झाली. नाफेड मार्फत बाजारात बंद असलेली खरेदी, अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान या मुद्द्यांना विरोधकांनी हात घालत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
यानंतर नाफेडची खरेदी, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच सभागृहात लव्ह जिहादचा मुद्दासुद्धा चांगलाच चर्चिला गेला असून यावर मतभेद पाहायला मिळाले. याशिवाय ठाकरे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या एक व्हिडीओ व्हायरलवरून विधानसभेत खडाजंगी झाली.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेतून मार्ग निघावा आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकाला यातून न्याय मिळावा अशी भूमिका शिंदे -फडणवीस सरकारची दिसून येत आहे. विरोधकांच्या आक्रमकतेला छेद देत सर्वाधिक चर्चा विधानसभा सभागृहात करण्यात येत आहे. प्रत्येक आमदाराला बोलण्याची आणि त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींसह तालिकाध्यक्ष देत आहेत.