कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात घेतली बैठक
पुणे – महायुतीचे यश आपल्या सर्वांच्या एकजुटीतच आहे. सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले तरच भरघोस यश आपल्या पदरी पडू शकेल. वेगवेगळ्या दिशेने चालू लागलो तर आपलेच नुकसान होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या सोमवार पेठ येथील प्रचार कार्यालयात महायुतीचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. बहुजन समाज पक्षाचे प्रदेश सचिव चंद्रकांत कांबळे यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. उत्तर प्रदेशातील आमदार रवी सतिजा, सदानंद शेट्टी, सुधीर जानज्योत, भाजपचे सरचिटणीस गणेश बीडकर, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, आरपीआय शहरप्रमुख अशोक शिरोळे, शिवसेनेचे अभय वाघमारे, नगरसेविका पल्लवी जावळे, आरपीआय (ए) च्या नगरसेविका हिमाली कांबळे, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे, नीलेश आल्हाट, सुखदेव अडागळे, भाजप-शिवसेना आणि आरपीआय (ए) चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत भरघोस यशासाठी मोदी, अमित शहा, रामदास आठवले, उद्धव ठाकरे यांच्यासह मी स्वतः वेगवेगळ्या भागांत सभा घेत आहे. सामान्य कार्यकर्त्यांनीही त्यात आपले योगदान दिल्यास आपल्याला व्यापक यश मिळू शकेल. त्यासाठी सर्वांनी एकज़ुटीने काम करण्याच्या सूचना देत कांबळे यांच्या निवडणूक प्रचाराचा आढावा घेतला.