शिवसेनेचा ढाण्या वाघ, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी घरोब्याचे संबंध असलेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा संघर्षमय प्रवास दोन दिवसांपूर्वी अचानक थांबला. “कोण आला रे कोण आला..! शिवसेनेचा वाघ आला..!’ अशाच गगनभेदी घोषणा त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या समर्थकांनी दिल्या.
तथापि, यावेळी दिल्या जाणाऱ्या घोषणांना अत्यंतिक दु:खाची किनार होती. डोळ्यातील दाटलेले पाणी सारत नेत्याचे अंतिम दर्शन घेण्याची प्रत्येकाचीच भावना. परंतु ती देखील अखेरीस पूर्ण होऊ शकली नाही. उरात कायमचे शल्य घेऊनच कार्यकर्ते स्मशानभूमीतून परतले.
नगर शहर व जिल्ह्यातील शिवसैनिकांचे दैवत असलेल्या उपनेत्याच्या अकाली निधनाने नगरमधील शिवसेना पोरकी झाली. चितळे रोडवरील शिवालय अक्षरश: सुन्न झाले आहे. अनेक खाच-खळग्यांशी संघर्ष करत उपनेते राठोड यांनीच नगरमध्ये शिवसेना उभी केली. अंबादास पंधाडे सारखा कणखर नेता त्यावेळी राठोड यांच्या साथीला होता. पंधाडे यांना शिवसेनेची “बुलंद तोफ’ असे म्हटले जायचे. स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनी या जोडीचे अनेकदा कौतुक केल्याचे शिवसैनिकच सांगतात.
आता मोठ्या संघर्षाने उभ्या केलेल्या शिवसेनेचा नगरमधील नवा नेता कोण? यावरुन सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. उघडपणे त्यावर कोणी बोलत नाही. मात्र, आतून अनेकांची नवा नेता होण्याची अतिव इच्छा लपून राहत नाही. त्यासाठी फिल्डींग सुरु झाली आहे. उपनेत्याच्या निधनानंतर अवघ्या दोनच दिवसांत डावपेच सुरु झाले आहेत. जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब बोराटे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, गणेश कवडे, आदींकडे त्यांचे समर्थक पाहत आहेत.
दरम्यान, जिल्हाप्रमुख म्हणून पक्षाची जबाबदारी असलेले प्रा. शशिकांत गाडे अलिकडे सक्रीय राजकारणात फारशे दिसले नाहीत. तसेच त्यांना राजकारणात फार रस उरलाय, असेही त्यांच्या बोलण्यातून आता जाणवत नाही. शिवसेना पक्षाच्या शहरप्रुखपदाची धुरा सध्या दिलीप सातपुते यांच्या खांद्यावर आहे. अखेरच्या काळात त्यांनी राठोड यांना खूप मोलाची साथ केली.
दुसरीकडे माळी समाजातील नेते आणि अलिकडेच ज्यांना स्वत: उपनेते राठोड यांनी महापौरपदाची उमेदवारी दिली होती ते बाळासाहेब बोराटे हे देखील नव्या नेता म्हणून दावेदार असू शकतात. माळी समाजासह अन्य समाजातही बोराटे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच त्यांना महापौरपदाची उमेदवारी दिल्याने राठोड यांचाही बोराटे यांच्यावर जीव होता, हे लपून राहत नाही.
माजी शहरप्रमुख संभाजी कदमही दावेदार असु शकतात. त्यांचे संघटन चांगले आहे. त्यांच्या पत्नी सुरेखा कदम यांनी महापौरपदही भूषविलेले आहे. मात्र, अलिकडची विधानसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर स्वत: उपनेते राठोड यांचा शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांवरच राग होता. त्यापैकी संभाजी कदम होते. कदम यांच्याशी त्यांचे सूत अखेरपर्यंत जुळलेच नाही.
दरम्यान, या काळात बाळासाहेब बोराटे यांनी राठोड यांना सावलीसारखी साथ दिली. शहरप्रमुख दिलीप सातपुते व बोराटे व दत्ता जाधव अखेरपर्यंत उपनेते राठोड यांच्यासोबत असलेले नगरकरांनी पाहिले. राठोड यांचे अलिकडच्या काळातील खंदे समर्थक म्हणूनही बोराटे यांच्याकडे पाहिले जात आहे.
शिवसेनेच्याच काही नगरसेवकांनी गद्दारी केल्याची भूमिका विक्रम राठोड यांनी सोशल मीडियात स्पष्टपणे मांडली होती.
त्यावरुन राठोड यांचा माजी शहरप्रमुखांसह काही नगरसेवकांवर राग कायम होता. शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांनी राठोड यांचाच प्रचार करत होतो, असाही दावा अलिकडेच केला होता. त्यामुळे त्यामुळे राठोड यांचा संशय खरा की खोटा?, हे तपासण्यासाठी कोणतेही माध्यम नाही. मात्र, त्या संशयावरुन अनेक नगरसेवकांना “शिवालया’ची दारे बंद होती.
अलिकडचे अनेक दिवस कदम यांच्यासह काही नगरसेवक उपनेते राठोड यांच्याजवळ दिसलेच नाहीत. काहींनी मध्यस्थीचा देखील प्रयत्न केला. मात्र, त्यात कुणालाच यश आले नाही. त्यामुळेच राठोड यांच्याशी एकनिष्ठ असलेले कडवे शिवसैनिक म्हणूनच सातपुते व बोराटे यांना साथ करतील, असा एक मतप्रवाह आहे.
शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी कालच शहरातील नियोजित उड्डाणपुलास दिवंगत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे नाव देण्याची मागणी केली. दरम्यान, त्या अगोदरच मागील महिन्यात नियोजित उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडतर्फे महापालिकेत नोंदविण्यात आलेली आहे. भविष्यात या मागणीवरुन नवा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र, उपनेते राठोड यांचे नाव देण्याची मागणी करुन कदम यांनी राठोड समर्थकांना आपलेसे करण्याचा केलेला हा प्रयत्न असावा, ही बाब लपून राहत नाही.
माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनाही पहिली महापौरपदाची संधी उपनेते राठोड यांनीच दिली. अलिकडेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांनीही उपनेते राठोड यांच्यावर विसंबूनच शिवसेनेत प्रवेश केला. परंतु आता उपनेतेच हयात नसल्याने शिवसेनेचा नगरमधील नवा नेता कोण? असा संघर्ष सुरु होईल, अशीच चिन्हे सध्यातरी निर्माण झाली आहेत.
संघर्षाने उभ्या केलेल्या शिवसेनेचा नगरमधील नवा नेता कोण? यावरुन सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. उघडपणे त्यावर कोणी बोलत नाही. मात्र, आतून अनेकांची नवा नेता होण्याची अतिव इच्छा लपून राहत नाही. त्यासाठी फिल्डींग सुरु झाली आहे. उपनेत्याच्या निधनानंतर अवघ्या दोनच दिवसांत डावपेच सुरु झाले आहेत. जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब बोराटे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, गणेश कवडे आदींकडे त्यांचे समर्थक पाहत आहेत.