12 वीचा निकाल लागून जेमतेम 2-3 दिवस झाले होते. त्यामुळे करिअर निवडीबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी बरेच पालक आणि मुले भेटायला येत होती. त्यातीलच एक म्हणजे रिनेश आणि त्याची आई. रिनेशला 12 वी मध्ये 82 टक्के मार्क मिळाले होते. त्यांनी त्याच्या आवडीनुसार दोन पर्याय निवडले होते. इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर पण यातलं नक्की काय निवडावं? आपण अधिक यश कशात मिळवू? हे त्याला नक्की ठरवणं अवघड जात होतं. म्हणून 12 वीची गुणपत्रिका घेऊन तो आईबरोबर आला होता.
त्याच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा घेतली. दोन्ही करिअरमध्ये पुढे उपलब्ध संधी, आवश्यक शिक्षण, घ्यावे लागणारे कष्ट, या करिअरमधील कामाचे स्वरूप आणि त्याचे व्यक्तिमत्त्व अशा दृष्टीने त्याच्याबरोबर अतिशय सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्येच करिअर करायचे निश्चित केले. या साऱ्या चर्चेत आईला मुलाच्या करिअर निवडीबाबत तिला विशेष रस वाटत नव्हता.
म्हणून चर्चा थांबवून आईला यामागचे कारण विचारले तर आईला रडू अनावर झाले; तिला बोलताही येईना. तेव्हा पुन्हा रिनेशने बोलायला सुरुवात केली. तो जरा वैतागलाच, “मॅडम माझा रिझल्ट लागल्यापासून ही असंच करतीये, सारखी रडत राहते. मी परीक्षेच्या आधी सांगितलं होतं की, मला अंदाजे 85 ते 90 टक्के मिळतील. आणि प्रत्यक्षात मला 82 टक्के मिळाले म्हणून ही सारखी रडतीये. आता बोर्डाच्या परीक्षेत थोडंफार पुढेमागे होणारच ना! हिला किती समजावलं पण ऐकतच नाही. मी तर कंटाळलोय तिला समजावून. आता सांगा तुम्हीच.’ तो बोलायचा थांबल्यावर त्याला बाहेर जायला सांगितलं. तो वैतागूनच बाहेर गेला.
तो बाहेर गेल्यावर आईला आणखीच रडू आलं. सुरुवातीला त्यांना थोडं रडू दिलं. मग त्या थोड्या शांत झाल्यावर त्यांना रडू येण्यामागचं कारण विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या. “आतापर्यंत रिनेशने सांगितलेले अंदाज कधीच चुकले नाहीत. त्याला स्वतःच्या क्षमतांची खूपच चांगली जाणीव आहे. 10 वी मध्ये सुद्धा त्याने 85 ते 90 टक्के मिळतील असं सांगितलं होतं आणि त्याला 89 टक्के मिळाले होते. मग याच वेळी असं का झालं? मी कमी पडले खूप त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असणार माझं, कारण मधले दोन महिने माझी सारखी आजारपण चालली होती.
त्यामुळे माझं दुर्लक्ष झालं त्याच्याकडे. तो वरवर सगळं छान आहे असं दाखवत असला तरी त्याला आतून खूप वाईट वाटलं असणारे. त्याला माझा खूप राग येत असणार माझी पक्की खात्री आहे. फक्त तो ते बोलून दाखवत नाही. पण आता तो माझ्यापासून मनानी दूर जाईल. त्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मी त्याला साथ नाही देऊ शकले. मी आई असूनही कमी पडले.’ त्यांना पुन्हा खूप रडू आलं. शांत होणंही त्यांना अवघड जात होतं. त्या थोड्या शांत झाल्यावर त्यांना रिनेश बरोबर घरी पाठवलं. पण पुन्हा भेटायला येण्याबद्दल सुचवलं. रिनेशला देखील काही सूचना दिल्या. ज्यामुळे आईला वाटणारा संशय कमी होण्यासाठी मदत होईल.
रिनेशच्या आईच्या बोलण्याचा जर नीट विचार केला तर आईच्या मानसिक, भावनिक अस्वस्थतेमागील “पक्की खात्री’ हा एकच अवास्तव विचार कारणीभूत आहे. हा विचारच इतका पक्का आहे की तो आईला वास्तव परिस्थिती स्वीकारूच देत नाही. या एका अवास्तव विचाराने आईचं मानसिक स्वास्थ्य इतकं बिघडून गेलंय की सारासार विचार करण्याची शक्ती आणि स्वतःवरचा आत्मविश्वासच ती गमावून बसलीये.
रिनेशची आई पुन्हा भेटायला आल्यावर मानसशास्त्रातील उपचार पद्धती वापरून आईला तिच्या याच अवास्तव विचाराची जाणीव करून देण्यासाठी आणि वास्तव परिस्थिती स्वीकारण्यास शिकवण्यात आले. ज्यामुळे तिचे मानसिक स्वास्थ्य पुन्हा स्थिर होण्यास आणि कौटुंबिक नातेसंबंध सुधारण्यास फायदा झाला आणि आई या “पक्की खात्री’ मधून बाहेर पडली.