मुंबई – दूरसंचार कंपन्यांच्या कनेक्टिविटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज तब्बल चार तास बंद ठेवण्याची नामुष्की शेअर बाजारावर आली. त्यामुळे गुंतवणूकदारांची भयंकर कुचंबना झाली.
सकाळी अकरा वाजल्यापासून काही क्षेत्रांचे निर्देशांक अदृश्य झाले. त्यानंतर दोन्ही बाजारानी संयुक्तरीत्या सकाळी 11.40 वाजतात कामकाज बंद केले. दरम्यानच्या काळात दूरसंचार सेवा देत असलेल्या दोन कंपन्यांकडे विचारणा करण्यात आली.
या दोन कंपन्यांनी तांत्रिक बिघाड झाला असून तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. शेवटी दुपारी 3.45 वाजता कामकाज सुरू झाले. यामुळे शेअर बाजाराचे कामकाज सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय दोन्ही बाजारांनी घेतला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेअर आणि शेअर डेरिव्हेटिव्हजचे कामकाज नियमित झाले.
याअगोदर जून, 2020 मध्ये आणि सप्टेंबर 2019 मध्ये शेअर बाजारात तांत्रिक बिघाडामुळे कामकाज काही काळ बंद ठेवावे लागले होते. अशा प्रकारामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांचे नुकसान होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना काय आणि कशी नुकसान भरपाई द्यायची याचे सूत्र तयार करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे राष्ट्रीय शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात सांगितले होते.