मुंबई – शेअर बाजार निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त वाढले असल्याचे वातावरण शेअर बाजारात चालूच आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून नफेखोरी चालू आहे. यामध्ये देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदाराबरोबरच परदेशी संस्थागत गुंतवणूकदारही सामील झाले आहेत. त्यामुळे निर्देशांकात गुरुवारी मोठी घट झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 336 अंकांनी कमी होऊन 60,923 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 88 अंकांनी म्हणजे 0.48 टक्क्यांनी घसरून 18,178 अंकांवर बंद झाला.
जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे गुंतवणुक अधिकारी व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की, सध्या कंपन्यांच्या शेअरचे भाव अपेक्षेपेक्षा जास्त असल्याची भावना गुंतवणूकदारांच्या मनामध्ये कायम आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये निर्देशांक एवढ्या उच्च पातळीवर दीर्घकाळात राहू शकणार नाहीत असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. किरकोळ गुंतवणूकदाराबरोबरच परदेशी आणि देशातील संस्थागत गुंतवणूकदार विक्रीत सामील झाले आहेत.
काही प्रमाणात करेक्शन झाल्यानंतर शेअर बाजार निर्देशांक स्थिर होतील असे त्यांनी सांगितले. रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. एशियन पेंट्स, टाटा स्टील, डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. कोटक बॅंक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
आशियाई आणि युरोपीयन शेअर बाजारातून सकाळी नकारात्मक संदेश आल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळू शकला नाही. शेअर बाजाराचे निर्देशांकात घसरत असल्यामुळे आज क्रुडच्या भावामध्ये थोडी घट झाल्याचे दिसून आले.