शेअर निर्देशांकात वाढ चालूच
मुंबई – लॉकडाऊन आणि चीनशी संघर्षामुळे आर्थिक आणि राजकीय वातावरण तापलेले असतानाही शेअरबाजार निर्देशांक मात्र दमदार आगेकूच करीत असल्याची परिस्थिती आहे.
शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 523 अंकांनी म्हणजे 1.53 टक्क्यांनी वाढून 34,731 अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी तो 640 अंकापर्यंत वाढला होता. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 1.51 टक्क्यांनी म्हणजे 152 अंकांनी वाढून 10,244 अंकांवर बंद झाला.
जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण आहे. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढत असल्यामुळे त्यांच्याकडून शेअरबाजारात गुंतवणूक होत आहे. आज झालेल्या खरेदीचा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फिन्सर्व या कंपन्यांना जास्त झाला. रिलायन्स शेअर आज 6 टक्क्यांनी तर बजाज फायनान्सचा शेअर 7 टक्क्यांनी वाढला. मात्र, इंडसइंड बॅंक, अल्ट्राटेक, आयटीसी, महिंद्रा, एचडीएफसी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. रिलायन्स कंपनी कर्जमुक्त झाल्यामुळे या कंपनीचा शेअर सध्या तेजीत असून तो उच्चांकी पातळीवर गेला आहे.
या परिस्थितीचे विश्लेषण करताना कोटक सिक्युरिटीज या संस्थेचे उपाध्यक्ष संजीव झारबडे यांनी सांगितले की, औद्योगिक देशातील लॉकडाऊन आता संपुष्टात येऊ लागले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात उमेद परत आली आहे. त्यामुळे जागतिक बाजाराबरोबरच भारतीय शेअरबाजारातही खरेदी होत असल्याचे वातावरण आहे.
भारतामध्ये करोना व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर चीन सीमेवर तणाव आहे. मात्र, देशातील मोठ्या शहरातील कामकाज पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आशावादी होऊ लागले आहेत.
आज रुपयाचे मूल्य 6 पैशांनी कमी होऊन रुपयाचा भाव 76 रुपये 20 पैसे प्रति डॉलर झाला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करीत असून गुरुवारी या गुंतवणूकदारांनी 366 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळत असल्याचे वातावरण आहे.