मुंबई – भारतात करोना रुग्न काही प्रमाणात वाढत आहेत. जागतिक पातळीवरही अशीच परिस्थिती आहे. स्थुल अर्थव्यवस्थेबाबत आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. या कारणामुळे गुंतवणूकदार खरेदीबरोबर विक्री करीत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा आल्या आणि दिवसाअखेर निर्देशांक कालच्या शुक्रवारच्या पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 13 अंकांनी कमी होऊन 52,372 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी दोन अंकांनी वाढून 15,692 अंकांवर बंद झाला.
भारती एअरटेल, टाटा स्टील, एचडीएफसी बॅंक, इन्फोसीस, एचडीएफसी, बजाज ऑटो, पावर ग्रिड या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. अल्ट्राटेक सीमेंट, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक, ऍक्सीस बॅंक, कोटक बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. आशियाई, युरोपियन आणि अमेरिकन बाजारातूनही संमिश्र संकेत आले.
दरम्याच्या काळामध्ये रुपयाच्या मूल्यात सहा पैशांची वाढ झाली. तर क्रुडचे दर एक टक्क्याने कमी झाले. शेअरबाजार निर्देशांक उच्च पातळीवर असतानाच देशात आणि परदेशात अनेक आघाड्यावर अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक खरेदी करावी की नाही या विचारात आहेत.
भारतामधील सेवा आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा निर्देशांक कमी झालेला आहे. त्याचबरोबर महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. या कारणामुळे गुंतवणूकदार शांत असल्याचे वातावरण आहे. त्याचबरोबर बरेच आयपीओ आगामी काळामध्ये येणार असल्यामुळेही निर्देशांकात फारशी वाढ होत नसल्याचे विश्लेषकांनी सांगितले.