पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागात राष्ट्रवादीची पकड असलेल्या इंदापूर, शिरूर, जुन्नर, खेड, पुरंदर मतदारसंघाच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणुकीचा माहोल असलेल्या जिल्ह्यात आता मतदारसंघाचा कारभारी कोण ठरणार आणि जनता जनार्दन कोणाच्या पारड्यात मतदान टाकले आहे, याचा कौल आता आज पहायला मिळणार आहे. त्यामुळे समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, यंदाची विधानसभेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने पहिल्यांदाच ताकदीने लढविली आहे. सहकाराचा बालेकिल्ला असलेल्या या दहा मतदारसंघात महायुतीने 59 वर्षांत प्रथमच तुल्यबळ उमेदवार आखाड्यात उतरविले आहेत. त्यामुळे निकालानंतर जिल्ह्यातील राजकारण, सहकार क्षेत्रातील संस्थांना कलाटणी मिळणार आहे.
पुणे जिल्हा हा सहकाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1960 पासून सहकाराच्या माध्यमातून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली मांड पक्की केली आहे. त्यामुळे गेल्या 1960 ते 1995 पर्यंत अपवाद वगळता कॉंग्रेसचीच सरशी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्याकाळी सहकारी संस्था आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सोसायटी, बॅंका, पतसंस्था आदींचे भक्कम नेटवर्क कॉंग्रेसने तळागाळात उभे केले होते, त्यामुळे कार्यकर्त्यांची बांधणी, संघटन कौशल्य आदींच्या बळावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने मुंबई, दिल्ली काबीज केली होती.
1995 पासून जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या हातामधील मतदारसंघात परिवर्तनाची नांदी येऊ लागली. त्यामुळे प्रस्थापितांना धक्कातंत्राचा अनुभव येऊ लागला. शिरूर, पुरंदर, बंडखोरी करून मिळविलेला विजय, हे प्रस्थापितांविरोधात दूरगामी परिणामकारक ठरले. 1999 नंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्यात भोर, इंदापूर, पुरंदर तालुक्यात कॉंग्रेसची ताकद मर्यादित राहिली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्राबल्य बारामती, आंबेगाव, खेड, शिरूर- हवेली, जुन्नर, दौंड विधानसभा मतदारसंघात ताकद वाढविली.
मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने प्रस्थापित राष्ट्रवादीला टक्कर देत आपले बस्तान बसविले आहे. गतवेळी खेडमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला. तर, जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला मनसेच्या इंजिनने धडक दिली. शिरूरच्या आखाड्यात कमळ फुलले. पुरंदरच्या गडावर शिवसेनेने आपला करिष्मा कायम ठेवला. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीने कॉंग्रेसवर मात केली. जिल्ह्यात भोरवगळता कॉंग्रेसच्या नकाशावर कोठेही आढळला नाही. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
भाजप आणि शिवसेनेने जिल्ह्याच्या मैदानात चांगलीच मशागत करून प्रस्थापित राष्ट्रवादीला बळ दिले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची झाली आहे. तसेच पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससमोर तोडीस तोड उमेदवार देऊन महायुतीने टक्कर दिली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार?
जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर आणि शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या आहेत. भोरमध्ये कॉंग्रेस वगळता सर्वच जागेवर राष्ट्रवादीची लढत ही भाजप आणि शिवसेनेबरोबर होत आहे. त्यामुळे नऊ जागेचा निकाल महायुतीच्या पारड्यात गेल्यास राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. गावपातळीपासून ते जिल्ह्यापर्यंत सहकार संस्थांचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे मजबूत नेटवर्क आहे. यावर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे विनासायास सहकारातील गड काबीज करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेला संधी मिळणार आहे. या निकालाची उत्सुकता काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पाच वर्षांचा कारभारी कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.