निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणार : मोठ्या गावांच्या विकासाला गती मिळणार
श्रीक्षेत्र देहूगाव, मावळातील कुसगाव बुद्रुक, खडकाळा, सोमाटणे, कान्हे, इंदोरी रांगेत
पिंपरी – पंचवीस हजार आणि त्याहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावांना आता “नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर “ग्रामोत्थान’ योजना तयार होणार आहे. या संदर्भात नियोजन आणि ग्रामविकास विभागाला ही नवी योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात दिले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या या निर्देशानंतर हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र देहूगाव लाभ मिळणार आहे. याशिवाय मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींची नव्याने लोकसंख्या गणना केल्यास कुसगाव बुद्रुक, खडकाळा (कामशेत), सोमाटणे, कान्हे, इंदोरी या पाच गावांनाही योजनेचा लाभ मिळू शकतो, अशी माहितीही आता समोर आली आहे.
राज्यातील 25 हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावांत केवळ कर संकलनावर विकासकामे करताना मर्यादा येतात. त्यामुळे अशा मोठ्या गावांच्या विकासासाठी “नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर “ग्रामोत्थान’ योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात नियोजन आणि ग्रामविकास विभागाला दिले. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे तीनशे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
मावळ तालुक्यात एकूण 103 ग्रामपंचायती आणि 188 गावे आहेत. आता वडगाव मावळ नगरपंचायत, तर तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषद आहे. मावळातील 2011 च्या जनगणनेनुसार एकाही गावची लोकसंख्या 25 हजारांहून अधिक नाही; मात्र नव्याने जनगणना केल्यास कुसगाव बुद्रुक, खडकाळा, सोमाटणे, कान्हे, इंदोरी ही मोठी गावे या नव्या योजनेत समाविष्ट होऊ शकतात.
राज्यात पंचवीस हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांची संख्या साधारपणे तीनशेच्या आसपास आहे. या गावात केवळ घरपट्टी कर संकलनाद्वारे विकास करताना निधीच्या कमतरतेमुळे अनेक मर्यादा येतात. त्यामुळे अशा मोठ्या गावांना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक वेळा मागणी होत असते. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शहरी भागाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या “नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर राज्यातील मोठ्या गावांसाठी “ग्रामोत्थान’ योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. ही योजना नियोजन विभाग आणि ग्रामविकास विभागाद्वारे तयार करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन या योजनेला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे.
…अशी मिळेल “ग्रामोत्थान’मुळे विकासाला गती
“ग्रामोत्थान’ योजनेमुळे मोठ्या गावांच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. या माध्यमातून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांची कामे, दिवाबत्ती, रस्ते दुरुस्ती, बाग-बगीचे विकास यांसारखी नागरी सुविधांची कामे केली जाणार आहेत. मोठ्या गावांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या योजनेमुळे राज्यातील मोठ्या गावांच्या विकासाला गती मिळेल, त्यादृष्टिने राज्य शासन कार्यवाही करणार आहे.
तुकोबांची देहूनगरी पात्र ठरणार
2011 च्या जनगणनेनुसार देहूगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या 27 हजार आहे. सध्या अंदाजे ती 35 हजारांपर्यंत पोहोचली असेल, असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. देहूत सध्या सात हजार कुटुंब संख्या (घरे) आहेत. याशिवाय मतदारसंख्या 14 हजारांच्या घरात आहे. राज्य शासनाने “ग्रामोत्थान’ योजनेस नियोजन विभाग आणि ग्रामविकास विभागाद्वारे तयार केले जाईल, त्यानंतर या योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास देहूगाव ग्रामपंचायत पात्र ठरेल.
2011 च्या जनगणनेप्रमाणे मावळ तालुक्यात एकही गाव 25 हजार किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेले नाही. गाव विकासासाठी शासनाने नव्याने गणना केल्यास मावळातील कुसगाव बुद्रुक, खडकाळा, सोमाटणे, कान्हे, इंदोरी ही मोठी गाव “ग्रामोत्थान’साठी पात्र ठरू शकतील.
– सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, मावळ.