80 वर्षांच्या नागरिकाचा घटस्फोटासाठी कौटुंबीक न्यायालयात अर्ज
मालमत्तेवरून पत्नी त्रास देत असल्याचे कारण
तब्बल 50 वर्षांच्या संसारानंतर आयुष्यात “मीठ’
पुणे – तब्बल 50 वर्षाच्या सहवासानंतर उच्चशिक्षित दाम्पत्याच्या संसाराला मालमत्तेच्या वादातून ग्रहण लागले आहे. पत्नीकडून देण्यात येणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने थेट कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला आहे. पतीचे वय 80 आहे. तर पत्नी 70 वर्षाची आहे.
माधव आणि माधवी (नाव बदलले आहे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना दोन मुली असून दोन्ही विवाहित आहेत. त्यातील एक परदेशात स्थायिक झाली आहे. पती-पत्नीचे कौटुंबीक आयुष्य व्यवस्थित सुरू असल्याने व्यावसायिक असलेल्या पतीने पत्नीला नवीन व्यवसाय सुरू करून दिला. तिला त्याचे संचालक बनविले. परंतु, अचानक पत्नीला कर्करोग असल्याचे समजल्यानंतर माधव यांनी तिची काळजी घेऊन आवश्यक तेवढे प्रयत्न करून तिला बरे केले. माधव यांना हदयविकार व मधुमेहाचा त्रास असताना पत्नी त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागली. परंतु, कर्करोगाच्या उपचारामुळे ती चिडचिड करत असल्याचे समजून पतीने तिच्याकडे सुरवातीला दुर्लक्षित केले. परंतु, पत्नी मालमत्तेसाठी छळ करत असल्याचे माधव यांच्या लक्षात आले.
“मला कायद्याने स्वतंत्र जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तू माझ्या आयुष्यातून बऱ्याबोलाने निघून जा, नाहीतर मी तुझा काटा काढेन. ते कोणालाही कळू देणार नाही’ अशी धमकी दिली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्या आणि चपलेने मारहाण करत पतीस घरातून हाकलून दिल्याचे तक्रारीत नमूद केले. माधव यांनी पत्नीकडे “मी आता वयोवृद्ध झालेलो आहे, मी आता या वयात कुठे जाऊ’ अशी विनवणी केली, पंरतु पतीचे काहीही ऐकून न घेता पत्नीने पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे होत असलेल्या त्रासामुळे माधव यांनी ऍड. वैशाली चांदणे यांच्यामार्फत घटस्फोटाचा दावा दाखल केला.
तिने गोड बोलून संपत्ती केली नावावर
माधवीने पतीकडून बंगला बांधून घेतला आहे. तसेच त्याच्यासोबत गोड बोलून सर्व संपत्ती नावावरून करुन घेतली आहे. माधवनेही प्रेमापोटी सर्व मालमत्ता पत्नीच्या नावावर केल्या. त्या मालमत्तेवर माधवी दरमहा 20 ते 25 लाखांपर्यंतचे उत्पन्न कमवत आहे. माधव हे सध्या घरात एकटेच राहत असून त्यांच्या जेवणाचीही कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही.