फुरसुंगी -पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावरील फुरसुंगी येथील पुलावरील वाहतूक कोंडी तुलनेने कमी झाली याचे समाधान आहे. तथापि या भागातील कचरा डेपोमधून दुर्गंधीचा त्रास कायम आहे. याशिवाय कचरा जाळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत, तरी महापालिकेने यावर तातडीने उपाययोजना करून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुळे यांनी आज याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर त्यांनी ही मागणी केली आहे. फुरसुंगी येथील अरुंद पुलामुळे याठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. येथे स्वतः सुप्रिया सुळे यांनी गाडीतून उतरून वाहतूक नियमन केले होते, त्यानंतर संबंधीत यंत्रणेची पळापळ झाली. सध्या, येथील वाहतूक कोंडी काही अंशी कमी झाली आहे, त्याबद्दल सुळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु, कचरा डेपोची समस्यां पुन्हा डोके वर काढत आहे.
फुरसुंगी येथील पुलाची पाहणी करताना त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. कचरा डेपोवर कॅपिंग केल्यापासून येथील दुर्गंधी कमी झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा या परिसरात कचऱ्याची मोठी दुर्गंधी सुटली आहे. याशिवाय डेपोमध्ये कचरा जळण्याचे प्रकार पुन्हा होऊ लागले आहेत. यातून परिसरात सर्वत्र धूर पसरलेला असतो, अशी तक्रार नागरिकांनी केली असल्याचे सुळे यांनी सांगितले. नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे हानिकारक आहे, महापालिकेने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली आहे.