नाशिक – राज्यातील अनेक विभागात रिक्त असलेल्या जागा भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जलसंपदा, महसूल, सार्वजनिक आरोग्य विभागात 60 ते 70 हजार जागांची भरती करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ही भरती लवकरच टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील विकासकामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला.
यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, शिक्षण, ग्रामविकास, गृह, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास, कृषी, पशु व संवर्धन, पोलिस विभाग आणि आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. सुरुवातीला पोलीस दलातील 8 हजार पदे भरली जातील. यानंतर आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने अन्य विभागातील सुमारे 60 ते 70 हजार रिक्त पदे भरली जातील, असे त्यांनी सांगितले.
तसेच तरूण सध्या अनेक प्रलोभनांच्या आहारी जातात. मात्र आम्ही कौशल्य विकासाचा कार्यक्रम हातात घेतला आहे. यातून तरुणांना स्वयंरोजगार उभारता येणार आहे. याशिवाय बळीराजाला दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दरवर्षी कर्ज फेडणाऱ्यांना काही ना काही देण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
सरकारमध्ये आल्यानंतर शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन थाळी यासारख्या योजना सुरु केल्या. या योजनेत जर काही त्रुटी राहिल्या तर लक्षात आणून द्या, सुधारणा करु. मराठी आपली मातृभाषा आहे. त्यामुळे मराठीत लिहिता-वाचता आलेच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.