मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. त्यातच आज 6,388 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 390 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात आतापर्यंत 61 लाख 75 हजार 010 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.8टक्के आहे. राज्यात आज 208 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.
राज्यात सध्या 62 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (4), धुळे (3) , हिंगोली (79), नांदेड (62), अमरावती (65), अकोला (44), वाशिम (21), बुलढाणा (86), यवतमाळ (13), वर्धा (11), भंडारा (1), गोंदिया (3), चंद्रपूर (83), गडचिरोली (20) या नऊ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,892 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भिवंडी निजामपूर, मालेगाव, जळगाव, नंदूरबार, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक 916 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 03,26, 812 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,75, 390 (12.67 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,98,397 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 507 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.