नागरिकांना दिलासा : विदर्भात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता
पुणे – राज्यात कमालसह किमान तापमानात किंचित घट झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रातील उन्हाचा चटका कमी झाला आहे. दुपारच्या वेळी ऊन असले तरीही वाऱ्यामुळे चटका जाणवत नाही. तर रात्री हवेत गारवा असल्यामुळे गरमाईपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातील कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, पुढील दोन दिवसांत विदर्भातील काही भागांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी झाल्या. तर विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली तर मराठवाड्यात किंचित वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी मध्य महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे कमाल तापमान 43 वरून थेट 36 ते 37 अंश सेल्सिअसवर आले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील लाट आता ओसरली असून, विदर्भ मात्र तापलेलाच आहे.
गुरूवारी (दि.9) राज्यात सर्वाधिक ब्रह्मपुरी येथे 45.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सद्या ब्रह्मपुरीसह चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा ही शहरे चांगलीच तापली असून, पुढील दोन दिवसांत याठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात एकीकडे विदर्भ आणि मराठवाडा तापलेला असताना मध्य महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर येथील किमान तापमानात घट झाल्यामुळे रात्री चांगली थंडी जाणवत असून, पर्यटकांकाडूनही या ठिकाणी गर्दी होत आहे.
शहरातील कमाल तापमानात घट
पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यामुळे गुरूवारी (दि.9) 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारी वारा सुटल्यामुळे उन्हाचा चटका फारसा जाणवत नाही. तर रात्रीच्यावेळी हवेत गारवा असल्यामुळे उकाडा काहीसा कमी झाला आहे. पुढील दोन दिवस शहरातील कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिल, आकाश निरभ्र राहिल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
राज्यातील काही प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
ब्रह्मपुरी 45.8, चंद्रपूर 45.4, नागपूर 44.6, वर्धा 44.2, अकोला, अमरावती आणि गोंदिया 43, परभणी 42.9, यवतमाळ आणि नांदेड 42.5, वाशिम 42.2, जळगाव 40.6, बीड 40.5, सोलापूर 40.2, उस्मानाबाद 40.1, बुलढाणा 39, औरंगाबाद 38.6, सांगली 36.3, सातारा 36.1, पुणे 36, कोल्हापूर 34.7, डहाणू 34.6, नाशिक 34.3, पणजी 34.2.